३०० व्या जयंती दिनाचे औचित्य साधून पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन
marathinews24.com
पुणे – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य, विचार आणि प्रेरणादायी जीवनगाथा जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती दिनाचे औचित्य साधून पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी कळविली आहे.
पशुसंवर्धन विभागामार्फत अधिनस्त संस्थांमध्ये कार्यालय, दवाखाना परिसर स्वच्छता व सुशोभिकरण, गाव पातळीवर वंधत्व, सर्वोपचार शिबिरांचे आयोजन करणे, फिरस्ती मेंढपाळांची भेट घेऊन त्यांना तांत्रिक मार्गदर्शन, मेंढपाळांच्या शेळ्या-मेंढ्यांचे मान्सुनपूर्व लसीकरण, पशुधनाचे जंतनिर्मूलन, गोचीड निर्मूलन, करडे, कोकरे मरतूक कमी करणेबाबत उपाययोजना, मेंढपाळांसाठी तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी शिबिर, परिसंवादाचे आयोजन, वृक्ष लागवड, जयंती वर्षानिमित्त विभागाच्या मुख्यालयातही अभिवादनपर कार्यक्रम आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पशुसंवर्धन विभागाच्या या उपक्रमांमुळे मेंढी-शेळी पालकांशी थेट संवाद साधता येऊन शासनाचे विविध उपक्रम, योजना तसेच शेळी-मेंढी तांत्रिक व्यवस्थापनाविषयी माहिती पशुपालकांना देणे शक्य होईल, तसेच शेळी-मेंढीपालनाला आधुनिक व्यवसाय व्यवस्थापनाच्या माध्यमातून अधिक किफायतशीर करण्यासाठी विभागाला आवश्यक धोरणांची निर्मिती व अंमलबजावणी करणे सुलभ होईल.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य समाजसेवा, धर्मनिष्ठा आणि कुशल प्रशासनाचे प्रतीक असून, ते महाराष्ट्र राज्याच्या प्रगत व उन्नत वाटचालीसाठी नेहमीच पथदर्शी ठरले आहे. त्या भारतीय इतिहासातील एक तेजस्वी, कर्तबगार व दूरदृष्टी असणाऱ्या स्त्री शक्तीचे प्रतीक आहेत. त्यांनी धार्मिक सहिष्णुता, समाजकल्याण, सार्वजनिक बांधकाम, न्यायप्रविष्ठ प्रशासन आणि स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून आदर्श राज्यकारभाराची उभारणी केली. जयंती वर्षानिमित्त “पुण्यश्लोक ३००” या विशेष बोधचिन्हाचा (लोगोचा) राज्य शासनाच्या शासकीय पत्रव्यवहारात वापर करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत, असेही डॉ. देवरे यांनी कळविले आहे.























