मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून अधिकाऱ्यांना सूचना
marathinews24.com
पुणे – शहराजवळील ‘नवले पूल अपघात प्रकरणानंतर अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात. त्याअनुषंगाने विविध यंत्रणांवरची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे, वाहतूक विषयक सुधारणा, वेगमर्यादा, तसेच सेवा रस्त्यांच्या कामातील भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावून महिनाभरात याबबातचा अहवाल सादर करावा’, अशा सूचना केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री, खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केली.
पुण्यात क्वीन्स गार्डन परिसरात घरफोडी- पावणेपाच लाखांचा ऐवज लांबवला – सविस्तर बातमी
नवले पूल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात नऊ ते दहा जण जखमी झाले. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात भेट दिली. शासकीय विश्रामगृहात शनिवारी मोहोळ यांनी विविध यंत्रणांमधील अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त (पीएमआरडीए) डाॅ. योगेश म्हसे, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, राज्य महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, ‘नवले पूल अपघात प्रकरणानंतर दीर्घकालीन उपायोजनांसह विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. नऱ्हे ते रावेत दरम्यान उन्नत मार्ग बांधणाची आरखडा मंजूर झाला. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यात येणार आहे. हे काम प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. जांभुळवाडी ते वारजे परिसरापर्यंत वर्तुळाकर मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या मार्गाने वाहतूक वळविली जाऊ शकते. हे काम प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. दरी पूल ते वडगाव बुद्रुक भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी तीन स्पीड गन आहेत. स्पीड गनची संख्या वाढविण्यात येणार आहे.
स्वामी नारायण मंदिर ते नवले पूल दरम्यान तीव्र उतार आहे. तेथे गतिरोधक पट्टी (रम्बलिंग स्ट्रिप) बसविण्यात आल्या आहेत. तीव्र उतारावर वेग कमी करण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जड वाहनांसाठी वेगमर्यादा प्रतितास ६० वरून ३० किलोमीटर अशी करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध जागेवरच कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.’
नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी विविध शासकीय यंत्रणावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. विविध यंत्रणांकडून याबाबत केलेल्या कामाचा अहवाल महिनाभरात सादर करावा. डिसेंबर महिन्यात कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक निश्चित करण्यात आली आहे,’ असे मोहोळ यांनी नमूद केले.
‘बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर टोलनाका येथे ट्रक, कंटेनर चालकांची तपासणी करण्यात येणार आहे. जड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल असल्यास जागेवरच उतरविण्यात येणार आहे. जड वाहनांची तांत्रिक, तसेच ब्रेक तपासणी करण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध ई-चलनाद्वारे कारवाई करण्यात येते. दरी पूल ते वडगाव बुद्रुक परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जड वाहनांविरुद्ध जागेवरच कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत’, असे मोहोळ यांनी सांगितले.
‘भूसंपादनामुळे बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्त्यांचे काम रखडले आहे. पाषाण भागात संरक्षण विभागाची जागा आहे. सेवा रस्त्यासाठी संरक्षण विभागाची जागा मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. सेवा रस्त्यावर पीएमपी बस, तसेच खासगी वाहतूकदारांचे थांबे आहेत. हे थांबे बेकायदा आहेत. प्रवाशांची सुरक्षा विचारात घेऊन थांबे बांधले पाहिजेत. बाह्यवळण मार्गावरुन दररोज साडेतीनशे पीएमपी बसच्या फेऱ्या जातात. सेवा रस्त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करावी’, असे आदेश माेहोळ यांनी दिले.
स्थानिक निवडणुकीचा महायुतीवर परिणाम नाही
‘पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार आणि शरद पवार) एकत्र येणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे’, असा प्रश्नु पत्रकारांनी मोहोळ यांच्याकडे उपस्थित केला. याबाबत मोहोळ म्हणाले, ’स्थानिक स्वराज्य संस्थेतील युती, आघाडीचा महायुतीवर परिणाम होणर नाही. स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेतल्या जातात.’






















