छेड काढणाऱ्यासह दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी
marathinews24.com
बीड (अनंत जाधव) – एस. पी. साहेब, गेल्या वर्षभरापासून शालेय विद्यार्थिनीची छेड काढल्याच्या दोन तक्रारी केज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याने अखेर छेड काढणाऱ्याच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. दहावीची विद्यार्थिनी रात्री आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्यानंतरही घटना केज पोलिसांनी दखल घेतली नाही. शेवटी पिडितेच्या नातेवाईक एसपींना थेट भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर दोषीविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
अंबाजोगाईत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत दीनदयाळ बँकेचे अधिकारी ठार – सविस्तर बातमी
पोलीसांनी लक्ष दिलं असते, तर मुलीचा जीव वाचला असता. या प्रकरणात दोषी पोलिसांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे. केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील गेल्या वर्षी नववीत शिकणाऱ्या मुलीला १९ वर्षीय अक्षय भगवान काळे हा सातत्याने त्रास देत होता. मोबाईल नंबरवर बोल म्हून हट्ट करत होता. संबंधित मुलीने हा प्रकार घरी सांगितला.त्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत नेले. त्याचबरोबर त्या मुलाच्या नातेवाईकांना याची माहिती दिली गेली. मात्र मुलाने त्रास देणे सोडले नाही.
अखेर मुलीला चिंचोली माळीच्या शाळेतून काढून केजच्या शाळेमध्ये दाखल केले. तिथेही संबंधित मुलगा हा त्रास देत होता. दरम्यानच्या काळात दोन वेळा पोलिसांकडे याबाबत तक्रार देण्यात आली. मात्र केज पोलिसांनी गंभीर दखल घेतली नाही. अखेर मुलाच्या त्रासाला कंटाळून दहावीत शिकणाऱ्या मुलीने रात्री दहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना घडल्यानंतरही केज पोलीस याप्रकरणी गांभीर्याने घेत नव्हते. शेवटी एसपींच्या आदेशाने दोषीविरोदात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केज पोलिसात सुरू हाते. पोलिसांची निष्क्रीयता आणि दुर्लक्षपणामुळे सदरील मुलीला जीव गमवावा लागला. याप्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.





















