विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेवर एक दर्जेदार साहित्यिक पर्व
marathinews24.com
मुंबई – मिती ग्रुप प्रस्तुत आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या मा. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विशेष पुढाकारातून साहित्य, कविता आणि विचारांची मेजवानी देणारे ‘साहित्य रंग’ या डिजीटल व्यासपीठाचा २५ वा भाग २६ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम मिती ग्रुप डिजिटलच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित होणार आहे.
हा २५ वा भाग असल्याने साहित्य रंग मालिकेचा हा प्रवास एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या अनेक भागांपासून सतत नवे साहित्यिक, कवी आणि विचारवंत प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत. या विशेष भागात लेखिका डॉ. माधवी वैद्य आणि कवी सौमित्र (किशोर कदम) आपले लेख, साहित्यिक विचार, कविता आणि रचना सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने या करणार असून, नेहमीप्रमाणे रसिकांशी संवाद साधणारी ही मालिका साहित्यप्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
लेखिका डॉ. माधवी वैद्य या प्रख्यात समीक्षक, संशोधक व माहितीपट निर्मात्या आहेत. आरती प्रभूच्या समग्र साहित्याचा अभ्यास या विषयावरच्या त्यांच्या पीएच.डी. प्रबंधाला ‘डॉ. वि.रा. करंदीकर’ पारितोषिक मिळाले. त्यांनी फर्ग्युसन, मॉडर्न व सेंट मीराज महाविद्यालयात अध्यापन केले तसेच ‘अनन्वय’ संस्थेद्वारे कवितेच्या प्रसाराचे कार्य केले. त्यांच्या लेखणीतून जवळपास २५ पुस्तके प्रकाशित झाली असून कवी शब्दांचे ईश्वर, मनस्विनी, नमन नटवरा, इट्स प्रभात अशा अनेक माहितीपटांची निर्मिती व दिग्दर्शन त्यांनी केले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ, राज्य ग्रंथ निवड समिती अशा महत्त्वाच्या संस्थांमध्ये त्यांनी नेतृत्व व मार्गदर्शन केले आहे. ‘इट्स प्रभात’ माहितीपटाला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार, साने गुरुजी विचार साधना पुरस्कार, न. चिं. केळकर पुरस्कार यांसह अनेक सन्मान त्यांच्या वाट्याला आले आहेत.
कवी सौमित्र (किशोर कदम) हे मराठीतील मान्यवर कवी तसेच बहुमुखी अभिनेते म्हणून परिचित आहेत. गेली तीन दशकं त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी रंगभूमी तसेच सिनेमात उल्लेखनीय भूमिका केल्या असून ध्यासपर्व, फॅन्ड्री साठी राज्य पुरस्कार आणि गोदाकाठ, अवांछित या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे. कवी म्हणून त्यांचा गारवा हा पावसाळी कविता-संगीत अल्बम लोकांच्या मनात आजही लोकप्रिय आहे. त्यांचे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध झाले असून आणि तरीही मी… या संग्रहाला राज्य पुरस्कारासह १६ नामांकित पारितोषिके मिळाली आहेत. आशा भोसले, सुरेश वाडकर यांसारख्या गायकांनी त्यांच्या कवितांना स्वर दिल्याने ते रसिकांमध्ये अधिक जवळचे ठरले आहेत.
आतापर्यंतच्या भागांमध्ये कवी-गीतकार दीपक कांबळी, लेखिका मोहना कारखानीस, लेखिका उषा तांबे, लेखक मिलिंद जोशी, लेखक गणेश मतकरी, कवी आदित्य दवणे, लेखक श्रीकांत बोजेवार, कवयित्री संगीता बर्वे, लेखिका सई लळीत, कवी हेमंत जोगळेकर, लेखिका राजेश्वरी किशोर, कवी विनय शिर्के, लेखक डॉ. अभय वळसंगकर, कवयित्री डॉ. अदिती काळमेख, लेखिका संपदा जोगळेकर कुलकर्णी, कवी समीर सामंत, लेखक डॉ. आशुतोष जावडेकर, कवयित्री पूजा भडांगे, कवयित्री डॉ. मंजूषा कुलकर्णी, कवयित्री डॉ. अनिता कांत, लेखक डॉ. अनंत सरदेशमुख, कवयित्री लता गुठे, लेखक अमोल उदगीरकर, कवयित्री सुनीति लिमये, कवयित्री निरुपमा महाजन, लेखक डॉ. मुकुंद कुळे, कवयित्री अंजली कुलकर्णी, कथालेखिका सुचिता घोरपडे, लेखक डॉ. संदीप श्रोत्री, कवी अमोल अहेर, लेखिका डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी, कवी हेमंत दिवटे आणि अन्य साहित्यिक सहभागी झाले आहेत. यामुळे ही मालिका एक समृद्ध साहित्यिक व्यासपीठ म्हणून मान्यता मिळवू शकली आहे.
‘साहित्य रंग’ ही मालिका डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या साहित्यिक जाणिवेचा आणि नव्या लेखक-कवींसाठी उभारलेल्या व्यासपीठाचा उत्तम नमुना आहे.
रसिक प्रेक्षकांना हा कार्यक्रम खालील लिंकवर पाहता येईल – लिंक – https://www.youtube.com/@mitigroupdigital8928























