अंबाजोगाईच्या सामाजिक कार्यकर्ते विनोद पोखरकरांच्या तत्परतेने टळला अनर्थ
marathinews24.com
बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यातील धारूर घाटातील अत्यंत धोकादायक वळणावर ऑइल टँकरमधून झालेल्या ऑइल गळतीमुळे अनेक वाहने घसरून अपघाताची मालिका सुरू झाली होती. मात्र, याच मार्गावरून प्रवास करणारे अंबाजोगाईचे सामाजिक कार्यकर्ते विनोद पोखरकर यांनी दाखवलेल्या अचाट तत्परतेमुळे आणि जिद्दीमुळे मोठा अनर्थ टळला असून, अनेक वाहनधारकांचे प्राण वाचले आहेत.
पौड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला लाच प्रकरणात पकडले – सविस्तर बातमी
मिळालेल्या माहितीनुसार, धारूर घाटातील एका कठीण वळणावर ऑइल टँकरमधून मोठ्या प्रमाणात ऑइल सांडले होते. रस्ता तेलकट झाल्यामुळे मागून येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या एकामागून एक स्लिप होऊ लागल्या. यात काही वाहनधारक जखमीही झाले. घाटात घसरगुंडी सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच वेळी विनोद पोखरकर हे आपल्या वाहनाने तिथून जात होते. एक गाडी घसरताना दिसताच त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि आपली गाडी बाजूला उभी केली.
प्रशासकीय मदतीची वाट न पाहता त्यांनी तातडीने रस्त्याच्या कडेची माती आपल्या हाताने उचलून ऑइल सांडलेल्या भागावर टाकण्यास सुरुवात केली. अत्यंत धोकादायक वळण असूनही, पोखरकर यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तब्बल अर्धा तास हाताने माती उपसून रस्त्यावर टाकली. केवळ माती टाकून ते थांबले नाहीत, तर येणाऱ्या प्रत्येक वाहनाला ओरडून “रस्त्यावर ऑइल सांडले आहे, गाडी हळू चालवा” अशी सूचना देऊन सतर्क करत होते.
त्यांच्या प्रयत्नांमुळे घाटातील संभाव्य मोठे अपघात टळले. एका कुटुंबाच्या गाडीला किरकोळ मार लागला, मात्र पोखरकर यांच्या सतर्कतेमुळे ते गंभीर दुखापतीतून वाचले. घाटात थांबायला जागा नसतानाही आणि परिस्थिती बिकट असताना विनोद पोखरकर यांनी जे धाडस दाखवले, त्याचे प्रत्यक्षदर्शींनी आणि परिसरातील नागरिकांनी भरभरून कौतुक केले आहे. “वेळेवर मदत मिळाली नसती तर आज अनेक संसार उघड्यावर पडले असते,” अशी भावना तेथील प्रवाशांनी व्यक्त केली.
























