शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन द्यावे-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
marathinews24.com
पुणे – एल-निनोच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन द्यावे. दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना बियाण्यांची टंचाई भासणार नाही, यादृष्टीने मुबलक प्रमाणात बियाण्यांची साठवूक करावी, असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. सर्व बियाणे उत्पादक, वितरक, विक्रेत्यांनी समन्वयाने कामे करावे, या उद्देशाने राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.
शिरनामे सभागृह, कृषी महाविद्यालय येथे आयोजित बियाणे उत्पादक कंपनी, वितरक आणि विक्रेत्यांची खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी आयुक्त सुरज मांढरे, महासंचालक राहूल माहिवाल, राष्ट्रीय सूचना केंद्राचे वरिष्ठ संचालक अविनाश पेडगावकर, संचालक विस्तार व प्रशिक्षण रफीक नाईकवाडी, संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण सुनील बोरकर, महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे संचालक अंबादास मिसाळ, कृषी उपसंचालक बियाणे व नोडल अधिकारी साथी डॉ. प्रिती सवाईराम, यांच्यासह सियाम, मासा व माफदा बियाणे उत्पादक, विक्रेते संघटनेचे प्रतिनिधी, बियाणे उत्पादक, वितरक आणि विक्रेते उपस्थित होते.
ॲड. जयस्वाल म्हणाले, महाराष्ट्र राज्याने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून विकसित महाराष्ट्र २०४७ च्या संकल्पपूर्तीच्यादृष्टीने काम करावे. बोगस बियाण्यांवर आळा घालून शेतकऱ्यांना उच्चप्रतीचे बियाणे उपलब्ध करुन देण्याकरिता साथी पोर्टलचा वापर करावा, असे ॲड. जयस्वाल म्हणाले.
मांढरे म्हणाले, उच्च उत्पादनक्षम वाणांचा वापर, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे देशाच्या बियाणे उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. याकरिता साथी पोर्टल हे महत्वपूर्ण पाऊल असून यामुळे उत्पादक व विक्रेत्यांना कायदेशीर अडचणीच्यावेळी पुरावा म्हणून ते उपयोगी पडणार आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यावर भर द्यावा, असेही श्री. मांढरे म्हणाले.
बोरकर प्रास्ताविकात म्हणाले, केवळ उच्चतम प्रतीच्या बियाण्यांमुळे पीक उत्पादनात २० टक्के पर्यंत वाढ होऊ शकते. शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे व दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र शासनाने साथी पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलची अंमलबजावणी खरीप हंगाम २०२३ पासून करण्यात आली आहे. बियाणे उत्पादक व विक्रेत्यांच्या संघटनेच्या सूचनेनुसार पोर्टलमध्ये आवश्यतेप्रमाणे बदल करण्यात आले असून पोर्टलच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे, असेही श्री. बोरकर म्हणाले.
यावेळी डॉ. प्रिती सवाईराम यांनी साथी पोर्टलची उद्दिष्टे, उपयोगिता, पोर्टलमध्ये उत्पादक, विक्रेत्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा आदीबाबत मार्गदर्शन केले. पेडगावकर यांनी पोर्टलचा वापर करतांना येणाऱ्या तांत्रिक अडचणीचे निराकरण करण्यात केले. तंत्र अधिकारी अनिल महामुलकर यांनी बियाणे कायद्यातील तरतुदी व बिटी कॉटन बाबत मार्गदर्शन केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते साथी पोर्टल मार्गदर्शक पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.























