१२ वर्षात मासेविक्रेत्यांना धमकावून उकळली २० कोटींची खंडणी
marathinews24.com
पुणे – कुख्यात गुंड बंडू आंदेकर टोळीच्या दहशतीचा आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे. पुण्यातील गणेश पेठ मच्छी मार्केटमधील मासेविक्रेत्यांना तब्बल १२ वर्षांपासून दहशतीखाली ठेऊन त्याने तब्बल २० कोटी रुपयांहून अधिक पैशांची खंडणी उकळली आहे. याप्रकरणी आता टोळीप्रमुख सुर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या घरातील महिलेसह ११ जणांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याच्या बॅगेत रिव्हॉल्वर अन काडतुसे – सविस्तर बातमी
पोलिस तपासात आंदेकर टोळीने २० कोटी रुपयांहून अधिक रक्कम ‘प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. व्यापाऱ्यांना धमकावून जागा मिळवून देणे. व्यवहारात सहकार्य करण्याच्या नावाखाली ही खंडणी वसूल केली जात होती. त्यानुसार आता या गुन्ह्यात कलम ३०८, ३०८(४), १११ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनावाखाली फरासखाना पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
तब्बल १२ वर्ष खंडणी उकळणाऱ्या आंदेकर टोळीचा धाक मोडीत काढण्यासाठी पुणे पोलिसांनी मोहिम हाती घेतली. त्यानुसार आंदेकर टोळीतील ११ जणांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तक्रारदाराने धाडसाने पुढे येऊन तक्रार दाखल केल्यामुळेच हा १२ वर्षांचा खंडणीचा प्रकार उघडकीस आला.गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अजित जाधव करीत आहेत.
गुन्हेगारी टोळ्यांचा आर्थिक कणा मोडणार
शहरातील विविध भागात अशा प्रकारे जर कोणाकडून खंडणी उकळली असल्यास त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान गुन्हेगारी टोळ्यांचे समूळ उच्चाटन होईपर्यंत अशाच कारवाया सुरू राहणार आहेत.























