चौकशीच्या मागणीसाठी दलीत मातंग संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा
marathinews24.com
बीड (अनंत जाधव)- लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दलित मातंग समाजातील अल्पवयीन विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. वसतिगृहात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून दलित समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेप्रकरणी सकल दलित(मातंग) समाज कृती समितीच्यावतीने केज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
बनावट ट्रस्टच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा – सविस्तर बातमी
विद्यार्थिनीचा मृत्यू आत्महत्येचा नसून संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला आहे.मृत विद्यार्थिनीला यापूर्वी शाळेतील काही कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचे आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी सखोल व निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे.घटनेनंतर प्रशासनाकडून अद्याप समाधानकारक माहिती देण्यात आलेली नाही. संबंधित विद्यालयातील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यां वर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यू मागील सत्य बाहेर येण्यासाठी सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी मागणी समाज कृती समितीने केली आहे. दरम्यान, जर येत्या सहा दिवसांत योग्य ती चौकशी व कारवाई झाली नाही,तर केज शहर बंद ठेवून तसेच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दलित समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.या घटनेमुळे जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यावेळी दलीत मातंग समाजातील युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.






















