विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा परिषदेमार्फत आयोजित १०० दिवस मोहिमेंतर्गत प्रमाणपत्र वितरण व सायकल बँक लोकार्पण कार्यक्रम
पुणे – राज्य शासनातर्फे सुरू असलेला १५० दिवसांचा कार्यक्रम प्रशासकीय मोहिम नसून जनतेशी शासनाला जोडणारा सेतू आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा परिषदेमार्फत आयोजित १०० दिवस मोहिमेंतर्गत प्रमाणपत्र वितरण व सायकल बँक लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.
पुण्यात ससून रुग्णालयातील गंभीर प्रश्नांवर शिवसेना आक्रमक – सविस्तर बातमी
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्य शासनातर्फे १०० दिवस मोहीम राबविण्यात आली होती. मोहिमेत विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या टिमने चांगले काम केले आहे. शासनाने मोहिमेसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले होते. या मोहिमेत चांगले काम झाल्यामुळे आता १५० दिवसांची मोहीम हाती घेतली आहे. विभागांनी अशा उपक्रमात सातत्य ठेवले पाहिजे अशी अपेक्षा आहे. विविध जिल्ह्यामध्ये चांगले काम झाले असून ते इतर जिल्ह्यात राबविले जावे, असा आमचा प्रयत्न आहे. विविध कार्यालयांनी जुनी पद्धत बदलून आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन कामाच्या अनावश्यक टप्प्यांना कात्री लावून नागरिकांचा वेळ व श्रम वाचवण्यासाठी एक प्रणाली उभारली गेली आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध विभागांच्या योजना सामान्य माणसांपर्यंत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत कशा पाहोचवता येतील यासाठी शासन प्रयत्न करत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गोरगरीबांची मुल शिकत असतात त्यांना विविध योजनांचा फायदा मिळण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध उपक्रम राबविले जातात. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधून हुशार मुला- मुलींची नासामध्ये २५ व इस्त्रोमध्ये ५० विद्यार्थी पाठविण्यासाठी आयुका संस्थेमार्फत निवड करुन त्यांचा खर्च जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविल्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांचे कौतुक केले.
जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आलेल्या सायकल बँक मोहिम सर्वात चांगली मोहिम म्हणून ओळखली जाणार असून यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील मुलींची शिक्षण आणि स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू होणार आहे. यामुळे शाळेत जाण्यासाठीची विद्यार्थ्यीनींची लांबची पायपीट लक्षात घेऊन मोफत सायकल उपलब्ध करुन दिली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या ८०४ शाळांमधील १३ हजार १०६ मुलींना सायकलींची आवश्यकता असून पहिल्या टप्प्यात ४ हजार ५०० विद्यार्थींनींना सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात ९ हजार सायकलींची आवश्यकता असून त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी व संस्थांनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, सीएसआरच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक कंपन्या सामाजिक उपक्रमात उदार अंतकरणाने नेहमी मदत करतात याचाच एक भाग म्हणून विविध कंपन्या व संघटनांनी ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना सायकली उपलब्ध करुन दिल्या आहेत. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना याचा निश्चितच उपयोग होईल. शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे या सामाजिक उद्देशाने काही कंपन्यांनी १०८ शाळांमध्ये वॉटर फिल्टर उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान पवार यांच्या हस्ते खेड तालुक्यातील वाडा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला फोर्स मोटर मार्फत बस हस्तांतर, चलत प्रयोगशाळेचा व मुलींसाठी सायकल बँक मोहिमेचा शुभारंभ, ग्रामिण भागातील शाळांना ह्युंडाई मोटर्सतर्फे आरो वॉटर प्लांटचे वाटप, सायबॅक व सागरमित्र यांच्यात सामंजस्य कराराचे हस्तांतरण, राज्य शासन पुरस्कृत, स्मार्ट क्लासरुमचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.
जिल्हा परिषद कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रातिनिधिक स्वरुपात ‘कौशल्य फेलो’ यांना नियुक्ती पत्राचे वितरण व शासनाच्या शंभर दिवस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल विविध विभाग प्रमुखांना प्रशस्तीपत्राचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविकात पाटील यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाला विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी आभार व्यक्त केले.























