राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम
marathinews24.com
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवनकार्य, विचारसरणी आणि कार्यपद्धतीवर बेतलेल्या ‘मोदी’ज मिशन’ या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आज मुंबईत राजभवन येथे झाला. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या कार्यक्रमाला सन्माननीय उपस्थिती होती.
भरत नाट्य मंदिराचे कार्य अतुलनिय- डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार – सविस्तर बातमी
प्रसिद्ध विधिज्ञ आणि लेखक बर्जिस देसाई यांनी लिहिलेले हे पुस्तक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाकडे “एका संकल्पनेची गाथा” म्हणून पाहते — ती संकल्पना म्हणजे राष्ट्रीय पुनरुत्थान आणि आत्मनिर्भर भारताची निर्मिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व म्हणजे विकसित भारताच्या पुनरुत्थानासाठी हाती घेतलेला वसा असे वर्णन, लेखकाने या पुस्तकात केले आहे.
सुरुवातीच्या काळात लोकांमध्ये असलेल्या चुकीच्या समजुती आणि पूर्वग्रह, यांवर पंतप्रधान मोदी यांनी दृढनिश्चय आणि काम तसेच ध्येयाप्रती निष्ठा या बळावर मात केली. कलम 370 रद्द करणे, अर्थव्यवस्था नियमबद्ध करणे, वस्तू आणि सेवा कराची (जी एस टी) अंमलबजावणी, नोटबंदी तसेच पारदर्शक राज्यकारभारासाठी केलेल्या प्रयत्नांसह त्यांच्या प्रमुख धोरणात्मक निर्णयांचे विश्लेषण, या पुस्तकात करण्यात आले आहे.
“जो मनुष्य प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःचा मार्ग तयार करतो, तोच खऱ्या अर्थाने महान ठरतो — आणि मोदीजींनी नेमके तेच करून दाखवले आहे”, असे आपल्या भाषणात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सांगितले. राज्यपाल पुढे म्हणाले की, मोदीजींनी देशासमोरील अनेक जटील प्रश्नांचे निराकरण शांतपणे आणि वाद टाळून केले असून, त्यांच्या नेतृत्वामुळे भारत आणि भारतीयांची प्रतिष्ठा संपूर्ण जगभर उंचावली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मोदी’ज मिशन’ हे पुस्तक मोदीजींचे जीवन, त्यांचे दृष्टिकोन आणि ध्येय यांचे सविस्तर चित्रण करते. यात त्यांनी आपले ध्येय कसे निश्चित केले आणि दृढनिश्चयाने ते कसे साध्य केले, हे प्रभावीपणे मांडले आहे. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी गरीब, शेतकरी, तरुणाई आणि महिला यांचे सक्षमीकरण करत, 2047 पर्यंत देशात मजबूत आणि स्थिर अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठीचा पाया रचला आहे. “जसे विसावे शतक महात्मा गांधी यांचे होते, तसे एकविसावे शतक नरेंद्र मोदी यांचे आहे”, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मोदीजींवरील ‘मोदी’ज मिशन’ हे पुस्तक, त्यांची कामगिरी, मिळवलेले यश आणि मूल्ये यांचे यथार्थ प्रामाणिक दर्शन घडवत असल्यामुळे इतर पुस्तकांपेक्षा ते वेगळे ठरते. असत्य माहिती पसरवण्याच्या युगात, हे पुस्तक धैर्याने आणि प्रामाणिकपणे सत्यकथन करते, असे त्यांनी नमूद केले. या पुस्तकातील प्रेरक कथा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या गेल्या तर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सुचित केले.
रुपा पब्लिकेशन्स या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेले ‘मोदी’ज मिशन’ हे पुस्तक, मोदीजींचा प्रवास, त्यांच्यापुढील आव्हाने आणि भारताच्या विकासातील त्यांचे योगदान यांचे सखोल वर्णन सादर करते.























