ऊरळी कांचन पोलिसांनी सोलापूरमधून केली अटक
marathinews24.com
पुणे – किरकोळ वादातून महिनाभरापूर्वी एकाचा खून करुन पसार झालेल्या दोघांना ऊरळी कांचन पोलिसांनी सोलापूरमधून अटक केली. स्वप्नील शिवाजी चौधरी, आदेश रेवलनाथ चौधरी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. संपत तुकाराम चौधरी (वय ४८, रा. वडाची वाडी, ता. हवेली) असे खून झालेल्याचे नाव आहे.
नायलॅान मांजा बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
थेऊर ते पेठ रस्त्यावर १९ डिसेंबर रोजी चौधरी यांचा मृतदेह सापडला होता. चैाधरी यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी ऊरळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांना खुनामागचे कारणही समजले नव्हते. मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
तपासात मिळालेल्या माहितीनुसार आरोपी स्वप्नील आणि संपत यांच्यात वाद झाले होते. वादातून स्वप्नील आणि आदेश यांनी संपत यांचा खून केल्याची माहिती तपासात मिळाली. दोघे जण सोलापूरमध्ये पसार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा लावून दोघांना पकडण्यात आले.
पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सचिन वांगडे, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगिरे, उपनिरीक्षक प्रवीण कांबळे, अमित सिद पाटील, पोलीस कर्मचारी योगेश नागरगोजे, अजित भुजबळ, राजू मोमीन यांनी ही कामगिरी केली.





















