मुख्यमंत्री फेलोशिप’ व ‘विधि विधान इंटर्नशिप’ तुकडींच्या अभ्यासभेटीत केले मार्गदर्शन
marathinews24.com
मुंबई – सामाजिक प्रश्न सोडवताना निष्ठा, प्रामाणिकता आणि जबाबदारीतूनच खरे यश मिळते. प्रश्न फक्त प्रसिद्धीसाठी नव्हे, तर सर्वसामान्यांच्या हितासाठी मांडले गेले पाहिजेत, असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. विधानभवनात ‘मुख्यमंत्री फेलोशिप’ कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत फेलोजची ७ वी तुकडी तसेच ‘विधि विधान इंटर्नशिप’ उपक्रमांतर्गत विद्यार्थींची ५ वी तुकडी यांच्यासाठी अभ्यासभेट, मार्गदर्शन व चर्चा-संवाद आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-३ डॉ. विलास आठवले कार्यक्रमाचे समन्वयक प्रिया खान, सह सचिव नागनाथ थिटे, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने आणि मुख्यमंत्री फेलोशिप’ कार्यक्रमातील सातवी तुकडी आणि ‘विधि विधान इंटर्नशिप’ उपक्रमातील विद्यार्थी उपस्थित होते.
पासपोर्ट कार्यालयाकडून पोलीस पडताळणीबाबत मार्गदर्शन – सविस्तर बातमी
‘मुख्यमंत्री फेलोशिप’ कार्यक्रमातील सातवी तुकडी आणि ‘विधि विधान इंटर्नशिप’ उपक्रमातील पाचवी तुकडी यांच्या अभ्यासभेटी व मार्गदर्शन सत्रात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी फेलो व इंटर्न्सना मार्गदर्शन केले. या संवादात्मक सत्रात डॉ. गोऱ्हे यांनी युवा पिढीला त कायदे, शासनाच्या योजना आदी क्षेत्रांचा सखोल अभ्यास करून समाजहिताचे कार्य करण्याचे आवाहन केले.
डॉ. गोऱ्हे यांनी कामाच्या व्यस्ततेतही स्वतःसाठी वेळ देण्याचे, निसर्ग, संगीत व छंद यांच्या माध्यमातून तणाव व्यवस्थापनाचे महत्त्व सांगितले. राजकारण म्हणजे समस्यांतून मार्ग काढण्याची कला आहे. सतत लोकांशी जोडून राहणे आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणे, हेच खरे लोकप्रतिनिधित्व आहे, असे त्यांनी नमूद केले. या मार्गदर्शन सत्रात फेलो व इंटर्न्सनी विविध सामाजिक व धोरणात्मक प्रश्नांवर विचारमंथन केले. डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्या उत्सुकतेचे कौतुक करून, प्रश्नांची मांडणी करताना तथ्य, पुरावे आणि सखोल माहिती वापरणे गरजेचे आहे,असे सांगत त्यांना भविष्यातील कामासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी विधानमंडळाचे दोन्ही सभागृह, ग्रंथालयास भेट देऊन माहिती घेतली.






















