स्वरमयी गुरुकुल आयोजित ‘किराना परंपरा’
marathinews24.com
पुणे – उस्ताद अब्दुल करीम खाँ हे नवतावादी विचार मांडणारे कालातीत दृष्टी असलेले द्रष्टा कलाकार होते. काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचे सांगीतिक विचार उलगडले किराना परंपरा या मालिकेतून. समकालीन कलाकारांपेक्षा वेगळा विचार करत संगीताच्या प्रांतातील सर्वच प्रकार लीलया पेलणारे अवलिया गायक म्हणून ख्यातकीर्त असलेले आणि किराना घराण्याचे अर्ध्वयू समजले जाणारे उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचे सांगीतिक विचार मांडले. ते संगीत शास्त्राचे अभ्यासक डॉ. केशव चैतन्य कुंटे आणि डॉ. प्रभा अत्रे यांचे शिष्य, गायक डॉ. अतींद्र सरवडीकर यांनी.
संघर्षाच्या गाथेबरोबरच भविष्यातील भारताचे प्रतिबिंब-इतिहासकार पांडुरंग बलकवडे – सविस्तर बातमी
‘किराना परंपरा’ ही विशेष कार्यक्रम मालिका डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशन संचालित स्वरमयी गुरुकुलातर्फे सुरू करण्यात आली आहे. स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या संकल्पनेतील या विशेष मालिकेतील दुसरे सत्र रविवारी (दि. ९) स्वरमयी गुरुकुल, शिवाजीनगरमध्ये पार पडले.
समाज व्यवस्थेसह संगीत क्षेत्रातही वर्ण व्यवस्थेचे, दर्जाचे महत्त्व ज्या काळात अस्तित्वात होते, त्या काळात उस्ताद अब्दुल करीम खाँ यांनी सर्व प्रकारचे संगीत सादर केले. फक्त ख्याल गायन म्हणजे शुद्ध, उच्च दर्जाचे गायन हा प्रवाह समाजात रूढ असताना त्यांनी दादरा, ठुमरी, टप्पा, होरी अशा वैशिष्ट्यपूर्ण विविध गायनशैली मुक्तपणे सादर केल्या व त्याचा आनंद रसिकांनाही दिला.
धृपद, ख्याल संगीत गाणाऱ्या शास्त्रीय गायकांनी ठुमरी हा गायन प्रकार निषिद्ध मानला होता. ठुमरी गायनाला हीन दर्जा दिला गेला होता. हे कोठ्यावरचे संगीत आहे, यात शृंगार, अदा, नखरे आहेत असा समज असलेल्या काळात उस्ताद अब्दुल करीम खाँ यांनी स्वत:चे सांगीतिक विचार मांडत ठुमरी गायनातून ईश्वर आराधना, भावभक्तीचे दर्शन घडविणाऱ्या बंदिशी सादर करून ठुमरी गायनाला किराना घराणाच्या गायकीत महत्त्वाचे स्थान देत प्रतिष्ठा मिळवून दिली. त्या काळातील सामाजिक वर्ण व्यवस्थेला विरोध करत सांगीतिक क्षेत्रातील उंचा-निचा हा भेद ओलांडून सांगीतिक रचनेनुसार त्यावर योग्य ते अलंकार चढविणारे ते द्रष्टा गायक होते.
भाषा, प्रांतानुसार संगीत सादर करावे असे मत ठामपणे मांडताना उस्ताद अब्दुल करीम खाँ यांनी गरबा, भजन, आरती, नाट्यसंगीत, गझल यांच्यासह अगदी संत रामदास स्वामी रचित मनाचे श्लोकही सादर केले याचे दाखले सापडतात हे सांगत उस्तादजींनी गायलेली नाट्यपदे, गझल, ठुमरी या प्रसंगी ऐकविण्यात आली.
कलाकारांचा सत्कार शास्त्रीय संगीताचे जाणकार सतीश टांकसाळे यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. प्रभा अत्रे यांच्या इच्छेनुसार किराना घराण्याच्या दिग्गज गायकांचे, त्यांच्या सांगीतिक विचारांचे जतन, संवर्धन व्हावे, दस्तावेजीकरण व्हावे या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रसाद भडसावळे यांनी दिली. आभार अश्विनी मोडक यांनी मानले.























