६ चॅनेलविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या नियकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट ३) परीक्षेची प्रश्नपत्रिका समाज माध्यमात प्रसारित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात समाज माध्यमातील सहा चॅनेलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या डाॅ. मनीषा ताठे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, समाज माध्यमातील सहा चॅनेलविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सोलापूर रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी
विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता, गणित, इंग्रजी, मराठी विषयातील कल जाणून घेण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट ३) ही परीक्षा घेण्यात येते. ११ एप्रिल रोजी मराठी भाषेचा संकलित चाचणी प्रश्नपत्रिका क्रमांक एक, १५ एप्रिल रोजी गणित विषय संकलित चाचणी प्रश्नपत्रिका २, २२ एप्रिल रोजी इंग्रजी विषय प्रश्नपत्रिका ३ या विषयांची परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात अलो होते. प्रश्नपत्रिका महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषषदेकडून तयार करण्यात येते. खासगी मुद्रणालयातून प्रश्नपत्रिकांची छपाई केली जाते. प्रश्नपत्रिका छापल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वितरण करण्यात येते. ही प्रक्रिया गोपनीय असते. मात्र, परीक्षा होण्यापूर्वीच सहा चॅनेलवर मराठी, इंग्रजी, गणित या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका प्रसारित झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर डाॅ. ताठे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या, तसेच अन्य परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम १९८२ चे कलम ५, ६ अन्वये आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
समाज माध्यमात प्रश्नपत्रिका प्रसारित कशी करण्यात आली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके तपास करत आहेत. ‘ही परीक्षा होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका समाज माध्यमात प्रसारित झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. ही प्रश्नपत्रिका कशी प्रसारित झाली. पैसे स्वीकारण्यात आले का ? या प्रकरणात आणखी कोण सामील आहेत का? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे’, असे पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी नमूद केले.दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांचे मराठी, इंग्रजी, गणित या विषयांचे मूल्यांकन करण्यासाठी दरवर्षी या कलचाचणीचे आयोजन केले जाते. राज्यभरातील शाळा, खासगी अनुदानित शाळांमधील सुमारे ३० लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. मात्र, परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका समाजमाध्यमात प्रसारित झाल्याचे उघडकीस आले. यापूर्वी दोन वेळा समाज माध्यमातील चॅनेलमधून प्रश्नपत्रिका प्रसारित झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी शिक्षकासह अल्पवयीनाविरुद्ध कारवाई करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.





















