ट्रक मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा; अपघातग्रस्त ट्रकचालकासह दोघांचा होरपळून मृत्यू
marathinews24.com
पुणे – वाहतूक निमयांचे उल्लंघन करीत ट्रक चालकाने क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करीत नवले पुलावर अपघात केल्याचे उघडकीस आले आहे. चालकाने उतारावर ट्रकचा वेग मर्यादित न ठेवता बेशिस्तपणे वाहन चालवित सार्वजनिक वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. याप्रकरणी ट्रक चालक-मालकासह सिंहगड रोड पोलिसांनी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अपघातग्रस्त ट्रक चालकासह दोघांचा मृत्यू झाला आहे.
ट्रक चालक रुस्तम रूदार खान (वय ३५, रा. किरवारी, किसनगड, जि. खेरतल, राजस्थान), मदतनीस (क्लिनर) मुस्ताक हनीफ खान (वय ३१, रा. मनापुरी, रासगड, जि. अलवर, राजस्थान), ताहीर नासीर खान (वय ४५, रा. किसनगड, राजस्थान) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मधुकर तुुपसौंदर यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अवजड ट्रक चालकाने गुरुवारी (दि. १३ ) संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास नवले पुलावर वाहनांना धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून, १३ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, भीषण अपघातास जबाबदार असलेल्या ट्रक चालक रुस्तम खान, क्लिनर मुस्ताक खान यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघातात ताहीर खान गंभीर होरपळला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत,’ अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. अपघातास जबाबदार असणार्या ट्रक चालकासह तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०५, २८१, १२५ (अ), (ब), ३२४ (४), मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९, १७७ अन्वये सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अवजड ट्रक राजस्थानातील असून, सातार्यातून गाडीत माल भरून मुंबईच्या दिशेने जात होता. गुरूवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नवले पुलावरील सेल्फी पॉईंटजवळ ट्रकचालक रूस्तमचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने भरधाव वेगात ट्रक चालवून इतर वाहनांना धडक देण्यास सुरूवात केली. १० ते १२ वाहनांना धडक दिल्यामुळे दोन ट्रकमध्ये मोटार अडकली. त्यातील गॅसमुळे भडका उडून लागलेल्या आगीत ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर १३ जण गंभीररित्या जखमी झाले. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांसह सिंहगड रस्ता पोलीस, वाहतूक पोलिसांनी तातडीने धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य राबवून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघनामुळे झाला अपघात
ट्रकचालकाने वाहतूक निमयांचे उल्लंघन केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. त्याने ट्रकच्या क्षमतेपेक्षा जास्त वजनाचा भार गाडीत भरला होता. त्यानंतर नवले पुल परिसरातून जाताना त्याने उतारावर गाडीचा वेग कमी केला नाही. वाहतूक निमयांचे उल्लंघन करीत थेट इतर वाहनांना धडक देण्यास सुरूवात केली. वेग नियमांचेही उल्लंघन केले. त्यामुळेच अपघात झाल्यामुळे ८ जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.























