मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निवेदन
marathinews24.com
मुंबई – डोंबिवली येथील खंबाळपाडा परिसरात २२ वर्षीय महिला सुरक्षा रक्षकावर झालेल्या अमानुष सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त करत या प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन सादर केले आहे.
कोथरूडमध्ये घरफोडी- साडेपाच लाखांचा ऐवज चोरी – सविस्तर बातमी
डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले की, ही घटना केवळ एका महिलेवरील अत्याचार नसून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला दिलेले गंभीर आव्हान आहे. पीडितेला पार्टीच्या बहाण्याने नेऊन ओलीस ठेवत तिच्यावर सामूहिक अत्याचार आणि अमानुष छळ करण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७० तसेच इतर कठोर कलमान्वये कारवाई करून ३० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सरकारतर्फे न्यायालयात प्रभावी बाजू मांडावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तपास प्रक्रिया गतीमान करत १५ ते ३० दिवसांत पूर्ण करावी, तसेच वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) नियुक्त करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यामुळे तांत्रिक पुरावे भक्कमपणे सादर होतील, असे त्यांनी नमूद केले. डोंबिवली-कल्याण परिसरातील निर्जन स्थळे, रिक्षा स्टँड आणि महिलांच्या कार्यस्थळांवर सुरक्षा वाढवण्यासाठी तातडीने सुरक्षा ऑडिट करून पोलीस गस्त वाढवण्याचे निर्देश द्यावेत, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. अशा घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झाल्यास भविष्यातील गुन्ह्यांवर आळा बसेल, असा विश्वास डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे.





















