४३ कोटींचा घोटाळा; दोन हजार गुंतवणूकदारांची फसवणूक
marathinews24.com
पुणे – जादा परताव्याचे आमिषाने नागरिकांकडून कोट्यावधी रुपये जमा केल्याप्रकरणात व्हॅलेंटीना इडस्ट्रीजचे संचालक संतोष बांदल आणि ज्ञानेश्र्वर चोरगे हे दोघे फरार झाले आहेत. गुरूवारी या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलविले होते. मात्र, ते हजर झाले नाहीत. कंपनीचे कार्यालय देखील बंद असून, कंपनीचे ३० कोटी गोठविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. याप्रकरणी संतोष नाथा बांदल आणि ज्ञानेश्वर अनंत चोरगे यांच्यासह इतर साथीदारांवर ‘बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंधक अधिनियम’ आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडले – सविस्तर बातमी
पुण्यातील कर्वे रस्ता परिसरातील ‘व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपनीने तब्बल ४३ कोटी १९ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरवातीला त्यांच्याकडे पोलिसांनी छापा मारून चौकशी केली. मात्र जेव्हा दुसऱ्यांदा त्या दोघांना चौकशीसाठी बोलविण्यात आले ते फरार झाले. आरोपींची कर्वे रोडवरील सक्सेस स्क्वेअर इमारतीत ‘व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेड’चे कार्यालय थाटले होते. जुलै २०२२ पासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडिया, व्हिडिओ आणि पत्रकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला होता.
“आमच्या कंपनीत गुंतवणूक करा आणि दरमहा ५ टक्के परतावा मिळवा,” असे आमिष त्यांनी लोकांना दाखवले. आपली कंपनी अत्यंत नफ्यात असल्याचे भासवण्यासाठी खोट्या बॅलन्स शीट आणि ऑडिट रिपोर्टचा आधार घेतला. कंपनीची उलाढाल ३०० कोटी रुपये असून कंपनीच्या ११ उपकंपन्या कार्यरत असल्याचे सांगून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. प्रत्यक्षात या कंपनीला कोणताही नफा होत नसताना, केवळ नवीन गुंतवणूकदारांकडून आलेले पैसे जुन्या गुंतवणूकदारांना परतावा म्हणून देऊन हा प्रकार सुरू ठेवला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.
तब्बल २ हजार लोकांची गुंतवणुक
कंपनीच्या योजनेत तब्बल २ हजार जणांनी गुंतवणूक केली आहे. आरोपींनी आरबीआय किंवा सेबीची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे ठेवी स्वीकारल्या आहेत. गुंतवणूकदारांना पार्टनरशिपचे आमिष दाखवण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात त्यांचे पैसे वैयक्तिक फायद्यासाठी वापरण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. “नागरिकांनी अशा कोणत्याही जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडू नये आणि गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीची अधिकृतता तपासावी,” असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गोरक्ष घोडके करत आहेत.





















