अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई
marathinews24.com
पुणे – अमली पदार्थ तस्करीविरोधात राज्य सरकारने अवलंबलेल्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाअंतर्गत अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने मोठी कारवाई करत तब्बल २ हजार ४०० किलो गांजाची विल्हेवाट लावली. या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत ४८ लाख ३६ हजार रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नीट पेपर लीक प्रकरणात ११ वी अटक – सविस्तर बातमी
रांजणगाव (ता. शिरूर) येथील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (एमईपीएल) केंद्रात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा गांजा नष्ट करण्यात आला. नाशिक शहरातील भद्रकाली पोलिस ठाण्यात २०१० मध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात हा गांजा जप्त करण्यात आला होता.
अमली पदार्थ व्यवस्थापन आणि विल्हेवाटीसंदर्भातील न्यायालयीन व कायदेशीर नियमांचे पालन करत उच्चस्तरीय अमली पदार्थ विल्हेवाट समितीच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडली. समितीने न्यायालयीन कागदपत्रे, गुन्ह्याची नोंद, जप्त मुद्देमालाचे वजन आणि सर्व संबंधित बाबींची पडताळणी करून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली.
विल्हेवाटीची प्रक्रिया केंद्रीय पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार आणि घातक कचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार करण्यात आली. त्यामुळे पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही कारवाई अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच एएनटीएफच्या विशेष पोलिस महानिरीक्षक ज्योती प्रिय सिंग, पोलिस उपमहानिरीक्षक प्रविणकुमार पाटील, पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.





















