पुणे पोलिसांकडून सायबर तक्रार निवारणाला वेग
marathinews24.com
पुणे – शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘प्रगती’ उपक्रमाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घातली आहे. महाराष्ट्र सायबर आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या सहकार्याने राबविण्यात येणार्या उपक्रमामुळे नागरिकांच्या तक्रारींचा जलद निपटारा, फसवणुकीतील रकमेचा मागोवा घेतला जाणार आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम सुरू केला आहे.
पाॅलिसीचे पैसे देण्याच्या आमिषाने ज्येष्ठाची २८ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
सायबर फसवणुकीत गेलेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी मनी रिस्टोरेशन मॉड्यूल प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. या प्रणालीद्वारे आतापर्यंत २ हजार ५३८ तक्रारींचा निपटारा केला आहे. फसवणुक झालेल्या नागरिकांचे तब्बल ८० लाख २७ हजार रूपये परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांत वेळ न दवडता गुन्हा दाखल करता यावा, यासाठी ई-झिरो प्रथम माहिती अहवाल सुविधा सुरू केली आहे. ५ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीत पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राची अडचण न येता तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला जात आहे. जुलै २०२६ पासून अशा २७ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.
तपासादरम्यान चुकीने किंवा विनाकारण गोठविलेल्या बँक खात्यांबाबतच्या तक्रारींच्या निवारणासाठी जीआरएम प्रणालीचा वापर केला जात आहे. त्याद्वारे जवळपास ९५ टक्के तक्रारींचे यशस्वी निवारण केले आहे. तसेच सायबर गुन्ह्यांत वापरण्यात येणार्या संशयित बँक खात्यांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन म्युल हंट मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत १३२ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तसेच समन्वय आणि सीआयएआर प्रणालींच्या माध्यमातून देशभरातील तपास यंत्रणांशी समन्वय साधला आहे. २०२४ पासून अटक केलेल्या १५२ आरोपींची माहिती राष्ट्रीय स्तरावर नोंदविली आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी पाठविलेल्या १ हजार ९८२ मागण्यांपैकी १ हजार २९८ प्रकरणांचा यशस्वी पाठपुरावा केला आहे.
सायट्रेन प्रणालीद्वारे दिले जातेय प्रशिक्षण
सायट्रेन प्रणालीद्वारे बीट अंमलदारांपासून तपास अधिकार्यांपर्यंत सर्वांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांचा तपास अधिक सक्षम होत असून, शाळा, महाविद्यालये, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये १ हजार १४२ जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला आहे. त्याद्वारे ३ लाख नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षिततेचा संदेश पोहोचविण्यात आला आहे. दरम्यान, सायबर चोरट्यांच्या आमिषाला बळी न पडता स्वतःच्या बँकखात्याचे संरक्षण करण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. तसेच सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० क्रमांकावर किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार संकेतस्थळावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे.
























