कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांची मुक्तता
marathinews24.com
पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. सुरक्षेचा उपाय, तसेच कायदा आणि सुव्यवस्था विचारात घेऊन पुणे पोलिसांनी ३०० काँग्रेस कार्यकर्त्यांविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून मध्यरात्री ताब्यात घेतले. शहा यांचा कार्यक्रम संपल्यानंतर कार्यकर्त्यांची मुक्तता करण्यात आली.
‘प्रगती’ उपक्रमाद्वारे सायबर गुन्ह्याना आडकाठी – सविस्तर बातमी
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्याचे शनिवारी (१ ऑगस्ट) आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुलटेकडीतील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहा यांच्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. पोलिसांनी या कार्यक्रमास परवानगी मागितली होती. मार्केट यार्डातील शिवनेरी रस्त्यावर आंदोलनास परवानगी देण्यात आली होती.काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चवधरी, महापालिकेतील गटनेते चंदू कदम यांच्यासह कार्यकर्ते, नगरसेवक उपस्थित होते. आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात नेले. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समर्थ पोलीस ठाण्यात नेले.
शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्रीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले. युवक काँग्रेसच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन, पर्वती ब्लाॅक काँग्रेसचे स्वप्नील नाईक, वडगाव शेरी ब्लाॅक काँग्रेसचे अध्यक्ष राजू ठोंबरे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष सद्दाम शेख, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष गौरव बाळंदे यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांना त्यांचे मोबाइल संच बंद करण्यास सांगण्यात आले. पोलिसांनी मोबाइल संच ताब्यात घेतले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात घोषणाबाजी केली.
‘दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली माेर्चावर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आले. पुण्यात शांततेत आंदोलन करण्यात येणार होते. कार्यकर्त्यांना घरातून ताब्यात घेण्यात आले. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात आहे. कार्यकर्त्यांकडून कायदा-सुव्यस्थेला तडा जाईल, असे कृत्य करण्यात येणार नव्हते. कार्यकर्त्यांना १६ तास ताब्यात ठेवण्यात आले. आमचे मोबाइल संच काढून घेण्यात आले. मोबाइल संच कोणत्या अधिकाराखाली ताब्यात घेण्यात आले. याचे उत्तर देण्याची गरज आहे’, असे अक्षय जैन यांनी सांगितले.
गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच गालबोट लागण्याची घटना घडू नये म्हणून विविध पक्षाच्या ३०० कार्यकर्त्यांना शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले. शहा यांचा कार्यक्रम संपल्यानंतर कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले.
– संजय दराडे, सहपोलीस आयुक्त, पुणे पोलीस
























