सरहदतर्फे स्वर्गीय श्रीमती जमनाबाई फिरोदिया ईशान्य भारत भवन आणि राणी गाइदीन्ल्यू मणिपुरी मुलींच्या वसतीगृहाचे भूमिपूजन
marathinews24.com
पुणे – ईशान्य भारत हा समृद्ध परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि गुणवत्तेने संपन्न भाग असून, देशाच्या प्रगतीमध्ये या प्रदेशाचे मोठे योगदान आहे. मणिपूर मधून पुण्यात येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी स्वर्गीय श्रीमती जमनाबाई फिरोदिया ईशान्य भारत भवन आणि राणी गाइदीन्ल्यू मुलींचे वसतीगृह सुरक्षित व आपुलकीचे दुसरे घर ठरेल, असा विश्वास मणिपूरचे उपमुख्यमंत्री लोसी दिखो यांनी व्यक्त केला. पुणे आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीशी एकरूप होऊन शांतता, एकता आणि प्रगतीचे दूत बना, असे आवाहन त्यांनी पुण्यात शिक्षण घेत असलेल्या मणिपुरी विद्यार्थ्यांना केले.
सीओईपीमधील वसतिगृहाची क्षमता वाढविण्याचा आराखडा सादर करा – सविस्तर बातमी
सरहद, पुणेतर्फे गुजर निंबाळकरवाडी येथे स्वर्गीय श्रीमती जमनाबाई फिरोदिया ईशान्य भारत भवन आणि राणी गाइदीन्ल्यू मुलींच्या वसतीगृहाचा भूमिपूजन समारंभ रविवारी (दि. २ ऑगस्ट) उपमुख्यमंत्री लोसी दिखो यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. फोर्स मोटर्सचे चेअरमन डॉ. अभय फिरोदिया, श्रीबाला फिरोदिया, चोरडिया मणिपूरमधील वरिष्ठ पत्रकार, ब्रोझेन्द्र निंगोम्बा, के. सरोजकुमार शर्मा, केशम यईफाबा, सरहदचे संस्थापक संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, अनुज नहार मंचावर होते.
वसतिगृह राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक
देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील युवा पिढीला दर्जेदार शिक्षण मिळण्याची समान संधी सुनिश्चित करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा व्यक्त करून उपमुख्यमंत्री लोसी दिखो पुढे म्हणाले, संघर्ष आणि आव्हानांचा सामना केलेल्या मणिपूरसारख्या प्रदेशातील युवा, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी सरहदचा उपक्रम अत्यंत मोलाचा असून विद्यार्थिनींना आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी सुरक्षित आणि पोषक वातावरण निर्माण होईल. मणिपुरी विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले, तुम्ही देशाचे भविष्य आहात आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्माण होणाऱ्या या इमारतीचा पूर्ण लाभ घेऊन पुणे आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीशी एकरूप होऊन शांतता, एकता आणि प्रगतीचे दूत बना. सर्वांनी एकत्र येऊन विकसित भारत घडविण्यासाठी कार्य करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. वसतिगृहाची सुविधा राष्ट्रीय एकात्मता आणि परस्परांमधील प्रेमाचे प्रतिक ठरेल, असेही ते म्हणाले.
नाते अधिक सदृढ होईल : डॉ. अभय फिरोदिया…
डॉ. अभय फिरोदिया म्हणाले, ईशान्य भारताला उर्वरित भारतापासून एकाकी पाडण्यासाठी परकीय शक्तींनी सर्वतोपरी प्रयत्न केले. वसतीगृहाच्या माध्यमातून दोन प्रदेशांमध्ये समन्वय साधला जात असल्याने लोकांचे लोकांशी नाते प्रस्थापित केले जाईल. आजची युवा पिढी राष्ट्राची दिशा घडविणार आहे. मणिपूर येथील युवा पिढीला सध्या सर्वाधिक तणावाचा सामना करावा लागत आहे. पुण्यासारख्या सुरक्षित ठिकाणी समरस होत त्यांना शिक्षण घेता येणार आहे. विविध प्रदेशातील परस्परांच्या सहकार्याचा युवा पिढीला उपयोग होणार आहे. सरहद संस्था या माध्यमातून माणसे जोडणारे पूल बांधण्याचे कार्य करत आहे.
प्रास्ताविकात संजय नहार म्हणाले, जेव्हा मणिपूरमध्ये संकट निर्माण झाले तेव्हा तेथील मुलींना शिक्षणासाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध व्हावे अशी मागणी आली. ही मागणी पूर्ण करण्यासाठी डॉ. अभय फिरोदिया यांच्या मदतीने सुसज्ज वसतिगृह उभारण्यात येत असून येथे अंदाजे शंभर विद्यार्थिनींची निवास, भोजन आणि शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या उपक्रमातून मणिपूरमध्ये अतिशय सकारात्मक संदेश दिला जाणार आहे.
लोसी दिखो यांचे स्वागत मणिपूरी विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन तर डॉ. अभय फिरोदिया यांचे स्वागत मणिपूरी विद्यार्थ्यांनी केले. तर इतर मान्यवरांचे स्वागत अनुज नहार, शैलेश वाडेकर, लेशपाल जवळगे यांनी केले. हर्षदा वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले तर अनुज नहार यांनी आभार मानले.
























