‘देवभाऊ’ पुस्तकाचे प्रकाशन; देशाचे पंतप्रधान म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पाहण्याची इच्छा : बाळासाहेब फडणवीस
marathinews24.com
पुणे – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिमत्त्व हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून अभ्यास, संवेदनशीलता, निर्णयक्षमता आणि माणुसकी यांचा दुर्मीळ संगम आहे. कुशल संघटक, प्रभावी राज्यकर्ता, अभ्यासू वाचक, विपुल लेखन करणारा लेखक, जिवाभावाचा मित्र आणि कुटुंबवत्सल व्यक्ती अशी त्यांची बहुआयामी ओळख आहे. सहकाऱ्यांच्या आणि कुटुंबीयांच्या आयुष्यातील छोट्यातील छोट्या घटनांचीही आठवण ठेवून योग्य वेळी अभिनंदन किंवा सांत्वन करणारा त्यांचा स्वभाव त्यांच्या संवेदनशीलतेची साक्ष देतो, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
ईश्वरी प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘देवभाऊ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या पुस्तकाचे लेखक संतोष गाजरे आहेत. कार्यक्रमास बाळासाहेब फडणवीस, भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे, महाराष्ट्र बँकेचे संचालक प्रसेनजित फडणवीस, व्याख्याते विशाल गरड, ईश्वरी प्रकाशनचे संतोष धायबर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “कोल्हापूर विमानतळासाठी ६० कोटी रुपयांच्या मंजुरीवर देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने स्वाक्षरी केल्यामुळे केंद्राकडून ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. जलयुक्त शिवार, रखडलेले सिंचन प्रकल्प, शेततळी, पाणलोट विकास, ‘मिसिंग लिंक’, अटल सेतू आणि पूरनियंत्रण यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांमागे त्यांची दूरदृष्टी आहे. २०१७ मधील शेतकरी कर्जमाफीचा निर्णय त्यांनी एका रात्रीत घेत पहाटे चार वाजता जाहीर केला. मराठा आरक्षणासाठी कायद्याचा सखोल अभ्यास करून तो न्यायालयात टिकेल अशी भक्कम तयारीही त्यांनी केली. नगरसेवकापासून मुख्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास मी जवळून पाहिला असून अभ्यास, संवेदनशीलता, निर्णयक्षमता आणि सर्वसामान्यांशी कायम जोडलेले राहणे हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख आहे.”
यावेळी बाळासाहेब फडणवीस म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात देशाचे पंतप्रधान व्हावे, ही माझी मनापासून इच्छा आहे. जनसंघाच्या काळात गंगाधरराव फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्रभर घरचा डबा घेऊन पक्ष उभारणीसाठी केलेल्या संघर्षमय प्रवासाच्या अनेक आठवणी आजही ताज्या आहेत. गंगाधरराव यांची निष्ठा, जिद्द, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली बांधिलकी हेच गुण आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रकर्षाने दिसून येतात.”
महाराष्ट्रभर ९९ स्वतंत्र साहित्य संमेलने भरविणार : राजेश पांडे
भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांची ओळख केवळ आक्रमक आणि अभ्यासू नेता अशी नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात विलक्षण संवेदनशीलताही आहे. सार्वजनिक जीवनातील अनेक प्रसंगांत त्यांचा मानवी पैलू प्रकर्षाने जाणवतो. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, विचार आणि संवेदनशीलता शब्दांत जिवंत करण्याचे मोठे कौशल्य लेखक संतोष गाजरे यांनी ‘देवभाऊ’ या पुस्तकातून दाखवून दिले आहे. वाचन, लेखन आणि वैचारिक परंपरा अधिक बळकट करण्यासाठी यंदा शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर ९९ विविध विषयांवर स्वतंत्र साहित्य संमेलने आयोजित करण्याचा आमचा संकल्प आहे.”
























