दोघांवर वार, शिवाजीनगरमधील घटना
marathinews24.com
पुणे – जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी टोळक्याने दोघांवर वार करून परिसरातील वाहनांची तोडफोड केल्याची घटना ७ जूनला रात्री साडेबाराच्या सुमारास शिवाजीनगरमधील आशियाना इमारतीसमोर घडली आहे. टोळक्याने परिसरात राडा घालून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चौघांना अटक केली असून, पसार आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ट्रक चालकाने रस्त्यावरच वळण घेतले, मोटार चालकाचा मृत्यू – सविस्तर बातमी
आदित्य उर्फ बारक्या राजेश वडसकर (वय २२), अर्थव अजय कदम (वय २४), रोहन संतोष शिंदे (वय २३), प्रथम नितीन मोहिते (वय २१ सर्व रा. शिवाजीनगर गावठाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. समीर शेख (वय ४८ रा. शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. टोळक्याच्या हल्ल्यात त्यांचा मुलगा आणि पुतण्या गंभीररित्या जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयाज फिरोज याच्यासोबत झालेल्या वादावादीचा बदला घेण्यासाठी टोळक्याने ७ जूनला रात्री साडेबाराच्या सुमारास शिवाजीनगर गावठाण परिसर गाठला. त्याठिकाणी फिर्यादी समीर शेख यांचा मुलगा आणि पुतण्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने हत्याराने वार करून गंभीररित्या जखमी केले.
त्यानंतर परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. वाहनांची तोडफोड करीत नुकसान केले. त्यासोबत शस्त्रबंदी आणि जमावबंदी असतानाही टोळक्याने नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे, सहायक आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी धाव घेतली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पांढरे तपास करीत आहेत.