रसिकांना मिळाली गायन, वादन आणि नृत्याची मेजवानी
marathinews24.com
पुणे – दर्जेदार गायन, वादन आणि नृत्याच्या सादरीकरणाने ब्रह्मनाद संगीत महोत्सवाचा पहिला दिवस रंगतदार ठरला. पूरियाकल्याण, जयजयवंती अशा रागांची अनुभूती रसिकांनी या निमित्ताने घेतली. ब्रह्मनाद कला मंडळ व धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित रौप्य महोत्सवी ब्रह्मनाद संगीत महोत्सवाचा सुरेल प्रारंभ झाला. धायरीतील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या कै. बंडोजी खंडोजी चव्हाण विद्यालयाच्या पटांगणावर हा संगीतमहोत्सव सुरू रंगणार आहे. गायन, वादन आणि नृत्याचा संगम साधणाऱ्या संगीत महोत्सवात युवा आणि प्रथितयश कलाकारांचे सादरीकरण होणार आहे.
दीपप्रज्ज्वलनाने या महोत्सवाची औपचारिक सुरुवात झाली. यावेळी ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर, प्रसिद्ध गायक डॉ. पंडित संजय गरुड, ब्रह्मनाद कला मंडळाच्या सचिव रागिणी गरुड, विश्वस्त सुभाष चाफळकर, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, संचालक अनिकेत चव्हाण, बाबा महाजन, प्रसिद्ध तबलावादक पं. पांडुरंग मुखडे, हेलिकल टेक्नॉलॉजीचे बिभास आंबेकर, गंगोत्री होम्सचे राजेंद्र आवटे, ज्येष्ठ तबलावादक पं. रामदास पळसुले, प्रसिद्ध बासरीवादक पं. राजेंद्र कुलकर्णी, पं. प्रमोद गायकवाड, रागिणी गरुड उपस्थित होते.
सुरुवातीला ब्रह्मनाद संगीत विद्यालयाच्या बालचमूने गणेश वंदना सादर केली. त्यानंतर युवा कथक नृत्यांगना सरगम गरुड यांच्या विद्यार्थिनींनी शिवस्तुती नृत्य सादर केले. पाठोपाठ स्वतः सरगम गरुड यांनी सुरुवातीला ताल त्रिताल सादर केला. उठान, थाट, आमद, टुकडे अशा पारंपरिक क्रमाने त्यांनी सादरीकरण केले. तसेच तराणा प्रस्तुत करत पदन्यासावरील प्रभुत्व दर्शवले.
मेवाती घराण्याचे प्रतिनिधित्व करणार्या गायिका मधुश्री नारायण यांनी राग पूरियाकल्याण सादर केला. ख्यालाची ‘आज सो बन’ ही विलंबित एकतालातील बंदिश तसेच द्रुत त्रितालातील ‘दिनरैन कछु ना सुहावे’ ही बंदिश, या दोन्ही पं. जसराज यांच्या असल्याचे मधुश्री यांनी सांगितले. मोजक्याच आलापीतून रागरूप दर्शवत मधुश्री यांनी तिन्ही सप्तकांत फिरणार्या आवाजाने प्रभाव पाडला. त्यानंतर ‘बाजे रे मुरलिया बाजे’ या भक्तिरचनेने मधुश्री यांनी आपल्या गायनाची सांगता केली.
पुणे हे शास्त्रीय संगीतातील जाणकार रसिकांचे शहर आहे. तसेच माझे ठुमरीगायनातील गुरू पं. अजय पोहनकर स्वतः इथे उपस्थित आहेत, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांना डॉ. उपेंद्र सहस्रबुद्धे (हार्मोनिअम) आणि रोहन पंढरपूरकर (तबला) यांनी साथसंगत केली.
ज्येष्ठ शहनाई वादक पं. शैलेश भागवत यांनी समयानुकूल असा राग जयजयवंती पेश केला. आलापांतून रागरूप दर्शवत त्यांनी विलंबित एकतालात मांडणी केली. त्यानंतर राग नटबिहागमधील रचना द्रुत त्रितालात पेश करत वेगळी वातावरणनिर्मिती केली. त्यांना अरूपसेन गुप्ता यांनी तबल्यावर तसेच डॉ. उपेंद्र सहस्रबुद्धे यांनी हार्मोनिअमची साथसंगत केली.
ब्रह्मनाद संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता प्रसिद्ध गायक पं. राजेंद्र कंदलगावकर यांच्या भारदस्त गायनाने झाली. राग जोगमधील ‘पिहरवा को बिरमाये’ (विलंबित एकताल – रामपूर सेहस्वान घराण्यातील बंदिश) आणि ‘साजन मोरे घर आयो’ (द्रुत त्रिताल) या रचनांमधून त्यांनी रागरूप नेमके उभे केले. ‘जो भजे हरीको सदा’ या भैरवीतील भक्तीरसपूर्ण रचनेने पं. राजेंद्र यांनी सांगता केली. त्यांना राजगोपाल गोसावी (तबला), संतोष अत्रे (हार्मोनिअम) यांनी पूरक साथसंगत केली. मिहीर भागवत, कल्याणी शेटे आणि रवी फडके सहगायनाची साथ केली.
माऊली टाकळकर यांचा सत्कार
ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर यांच्या शतक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून त्यांचा विशेष सत्कार ब्रह्मनाद संगीत महोत्सवात पं. अजय पोहनकर यांच्या हस्ते करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या सत्काराचे स्वरूप होते.
पं. पोहनकर म्हणाले, माऊली म्हणजे प्रेमळ आणि प्रेमाने साथ करणारे व्यक्तिमत्व आहे. मला ते 9 व्या वर्षापासून ओळखतात.
पं. संजय गरुड म्हणाले, माऊली हे ऋषितुल्य आहेत. पं. भीमसेनजींना त्यांनी सलग अर्धशतक साथ केली आहे. शिवाय अडीच हजार ध्वनिमुद्रणे केली आहेत. त्यांचे हे कार्य रेकॉर्डब्रेक आहे. वारकरी संप्रदायातील टाळ त्यांनी शास्त्रीय संगीताच्या व्यासपीठावर रूढ केले.
स्मरणिका प्रकाशन..
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ब्रह्मनाद कला मंडळाची रौप्य महोत्सवी वाटचाल उलगडणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच ब्रह्मनाद संगीत मंडळाचे आधारस्तंभ दिनेश माझिरे यांचाही सत्कार करण्यात आला. प्रसाद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
























