तलवाडा पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह
marathinews24.com
बीड : (अनंत जाधव) – गेवराई तालुक्यातील नादलगाव येथे अदिवासी कोळी महादेव (एसटी) समाजाचे ग्रामपंचायत सेवक जालिंदर मच्छिंद्र सुरवसे यांना गावातील १० लोकांनी बेदम मारहाण केली होती. ही घटना दि.६ डिसेंबरला घडली होती . मारहाणीत पीडित सुरवसे यांचे दोन्ही पाय व हात फॅक्चर झाले असून त्यांच्यावर बीडमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एकतर्फी प्रेमातून प्रेयसीच्या पतीचा केला खून – सविस्तर बातमी
तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून १० दिवस उलटून गेले तरीही अद्यापही या प्रकरणातील आरोपी मोकाट असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांवर राजकीय दबाव आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी प्रकरणात लक्ष घालून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे.
गोविंद सखाराम राऊत, विष्णु आश्रुबा राऊत, भगवान आश्रुबा राऊत, आश्रुबा उत्तम राऊत, अनिल ताराचंद राऊत, अनिल आश्रुबा शिंदे, विमल सखाराम राऊत, अनिता विष्णु राऊत, अविद्या भगवान राऊत, कांताबाई ताराचंद राऊत,या दहा जणांविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध १० डिसेंबर २०२५ रोजी तलवाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बी एन एस) २०२३ आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ कायदयानुसार कलम ११९(१), ११८(२), ११८(१),११५(२)१८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३), १९०, ३(१) आर ,३(१) एस,३(२) व्हि ,ए कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालिंदर सुरवसे यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हल्लेखोर आरोपीना अटक करण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. त्यामुळे पीडित कुटुंबाने नाराजी व्यक्त केली आहे. हल्लेखोर आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.






















