आरोपीला यवतमधून अटक; जेजुरी आणि स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
marathinews24.com
पुणे – एकतर्फी प्रेमातून त्याचे तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा होती. पण तिचे दुसऱ्या सोबतच लग्न झाले. याचाच राग मनात धरून त्याने प्रेयसीच्या पतीलाच संपविल्याचा धक्कादायक घटना जेजुरी परिसरात घडली आहे. याप्रकरणी जेजुरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तीकरित्या कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
येरवडा कारागृहात कैद्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू – सविस्तर बातमी
आरोपी सुशांत संदिप मापारे (वय २१ रा. माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे. मुळ रा. पिंपळगाव ता. दौंड, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. १४ डिसेंबरला दिपक गोरख जगताप (वय २२, रा. माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे) यांचा मृतदेह माळशिरसमधील रामकाठी शेताच्या शिवारात आढळला होता. दिपक जगताप यांच्यावर धारदार हत्याराने वार करून मृतदेह फेकून देण्यात आला होता. याबाबत संतोष रोहीदास शेंडकर (वय ४६ रा. चांबळी, ता.पुरंदर) यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्ह्याच्या अुनषंगाने स्थानिक गुन्हे शाखे पोलिस व जेजुरी पोलिस तपास करत होते.
आरोपी मापारेचा पथाकाद्वारे शोध घेतला जात असताना तांत्रिक तपासामध्ये आरोपी हा जिल्ह्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता. तो यवत परिसरात लपून बसला असल्याची माहिती समजली. या आधारे मापारे याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत एक अल्पवयीन आरोपी असल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले. मापारे याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला २२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, जुजूरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिपक वाकचौरे, उपनिरीक्षक अमित सिदपाटील, महेश पाटील, नामदेव तारडे, सर्जेराव पुजारी, अमंलदार आण्णासाहेब देशमुख, तात्यासाअेब खाडे, दशरथ बनसोडे, विठ्ठल कदम, संदिप भापकर, हेमंत भोंगळे, सचिन गाडगे, अमोल शेंडगे, मंगेश भगत, धिरज मोमीण यांच्या पथकाने ही कारवाई केली.
एकतर्फी प्रेमातून केला खून
सुशांत मापारे याचे मृत दिपक जगताप यांच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम होते. तिच्यासोबत लग्न करण्याची आरोपीची इच्छा होती. परंतु तिचे लग्न दिपक यांच्या बरोबर झाल्याने त्याचा राग त्याच्या मनात होता. याच कारणावतून त्याने दिपक यांना दारू पिण्याच्या निमित्ताने बोलावून घेतले. एका अल्पवयीन साथीराच्या मदतीने त्याच्यावर धारदार हत्याराने वार करून खून केला. नंतर मृतदेह माळशिरस गावच्या रामकाठी शेताच्या शिवारात फेकून दिला.





















