शेतीतील मातीपासून न्यायाच्या लढाईपर्यंत; अजयची प्रेरणादायी वाटचाल
marathinews24.com
बीड – जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मस्साजोग गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा अजय जीवन देशमुख याने एक प्रेरणादायी वाटचाल पूर्ण करत कायद्याच्या क्षेत्रात यश मिळवले आहे. अजय देशमुख याने ऑल इंडिया बार परीक्षा उत्तीर्ण केली आहे ,व मस्साजोग गावाचे पहिले वकील होण्याचा मान मिळवला आहे.
कलेसाठी आयुष्यभर विद्यार्थी दशेतच रहावे लागते-पंडित पांडुरंग मुखडे – सविस्तर बातमी
अजय देशमुख याचे प्राथमिक शिक्षण मस्साजोग येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले असून, अत्यंत सामान्य आर्थिक परिस्थितीत वाढलेल्या अजयने शिक्षणाकडे कायम गांभीर्याने पाहिले. त्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी अंबाजोगाईला जावे लागले. परंतु लहानपणापासून शिक्षणाची आवड असल्यामुळे हार न मानता शिकत राहिला.
पुण्यातून घेतले उच्च शिक्षण, समाजाचे देखील मिळाले योगदान
कायद्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अजय ने पुणे गाठले. शिक्षणाचा खर्च भागवताना अनेक अडचणी आल्याच पण अशावेळी मराठवाडा मित्र मंडळ शैक्षणिक संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव सर यांनी त्याला वेळोवेळी मदत केली. संस्थेच्या वस्तीगृहाची सुविधा मिळवून दिल्यामुळे अजयला पुण्यात राहण्याची सोय झाली. या काळात त्याने शिक्षणासोबतच विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.
मस्साजोग गावातील अजय देशमुख हा पहिलाच कायद्याचे शिक्षण घेऊन ऑल इंडीया बार परीक्षेत उर्त्तीण होणारा विद्यार्थी ठरला आहे. त्याच्या या यशामुळे गावामध्ये आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे. अजयचे वडील एक अल्पभूधारक शेतकरी आहेत, अजयचे कुटुंब शिक्षणासाठी नेहमीच पाठिशी राहिले. विशेष म्हणजे, अजयच्या शैक्षणिक वाटचालीत दिवंगत सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचेही मोठे योगदान होते.
सामाजिक न्यायासाठी लढण्याची तयारी
आपल्या यशानंतर अजयने स्पष्ट केले की, समाजातील वंचित, पीडित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कार्यरत राहीन. मिळवलेल्या कायद्याच्या ज्ञानाचा वापर सामाजिक परिवर्तनासाठी करणार आहे. गरजूंसाठी मोफत कायदेशीर मदत पुरवण्याची भावना देखील व्यक्त केला आहे.
कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण
अजय ने मिळवलेल्या यशाबद्दल संपूर्ण देशमुख कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी आणि संपूर्ण मस्साजोग गावकऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक केले.






















