बीड : (अनंत जाधव) – राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेले असतानाच, प्रशासकीय दप्तर दिरंगाईमुळे कुणबी प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या नैराश्यातून शेतकऱ्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या मांजरसुंबा येथील येमपुरे वस्तीवरील रहिवासी बाबुराव विठ्ठल येमपुरे (वय ५५) शनिवारी (दि.२८) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
शाळकरी विद्यार्थिनीची आत्महत्या; केज तालुक्यातील तांबव्यातील घटना – सविस्तर बातमी
मिळालेल्या माहितीनुसार, बाबुराव येमपुरे हे गेल्या अनेक दिवसांपासून कुणबी प्रमाणपत्रासाठी प्रयत्नशील होते. त्यांच्या भावकीतील इतर सर्व लोकांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले आहे. मात्र, बाबुराव आणि त्यांच्या मुलाचे प्रमाणपत्र तांत्रिक कारणांसह प्रशासकीय त्रुटींमुळे रखडले होते. यासाठी त्यांनी तहसील कार्यालयाचे उंबरठे अनेकवेळा झिजवले होते. परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली.
नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल
बाबुराव यांना स्वतःपेक्षा आपल्या मुलाच्या भविष्याची अधिक चिंता होती. मुलाला शिक्षणात किंवा नोकरीत आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी कुणबी प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक होते. सर्व नातेवाईकांचे काम झाले असताना आपलेच काम का होत नाही? या विवंचनेतून ते गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणावाखाली होते. माझ्या मुलाचं पुढे काय होईल? हा प्रश्न त्यांना सतावत होता. याच नैराश्यातून त्यांनी ससेवाडी शिवारातील स्वतःच्या शेतात जाऊन टोकाचे पाऊल उचलले.
परिसरात हळहळ आणि संताप
घटनेनंतर मांजरसुंबा परिसरात मोठी गर्दी जमली होती. माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेकनूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. साध्या प्रमाणपत्रासाठी कष्टकरी बापाचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे प्रशासनाच्या संथ कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे. बाबुराव येमपुरे यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि मोठा परिवार आहे. या घटनेमुळे येमपुरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आरक्षणाच्या आणि प्रमाणपत्राच्या प्रक्रियेतील गुंतागुंत सामान्य माणसाचा जीव घेत असल्याचा आरोप आता ग्रामस्थांकडून केला जात आहे.























