बाबा आढाव यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंकडून श्रद्धांजली
marathinews24.com
पुणे – बाबा आढाव हे कष्टकऱ्यांचे खरे बाबा होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन वंचितांच्या न्यायासाठी समर्पित केले. त्यांच्या लढ्याने प्रेरित होऊन मी आणि अनेक कार्यकर्ते आजही सामाजिक न्यायासाठी झटतो. त्यांच्या जाण्याने माझ्यासह, श्रमिक, कष्टकरी, दलित, वंचित वर्ग पोरका झाला आहे, पण हृदयात त्यांच्या लढ्याची ज्योत कायम राहील. बाबा, तुम्ही आम्हाला सोडून गेलात, पण तुमचा आदर्श आम्हाला नेहमी मार्गदर्शन करेल.” अशा शब्दांत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी स्वतःचे आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला…- सविस्तर बातमी
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचा आधारस्तंभ, ज्येष्ठ समाजसेवक व कष्टकऱ्यांचे दृढनिश्चयी नेते डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव (बाबा आढाव) यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्य शोकमग्न झाले आहे. वयाच्या ९५व्या वर्षी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. गेल्या दहा दिवसांपासून प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.
बाबा आढाव हे केवळ एक सामाजिक कार्यकर्ते नव्हते, तर असंघटित मजुरांचे ‘आभाळ’ होते. १९५० च्या दशकापासून त्यांनी हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायत आणि ‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळींसारख्या अभियानांद्वारे शोषितांच्या हक्कांसाठी आयुष्य वाहिले. महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून जातिव्यवस्था, वर्गभेद आणि लैंगिक विषमतेविरोधात त्यांनी अनेक जनआंदोलने उभारली. समाजवादी विचारसरणीचे निष्ठावान अनुयायी म्हणून त्यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीने एक प्रमुख मार्गदर्शक गमावला असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.




















