६४ मुमुक्षूंनी सांसारिक जीवनाचा त्याग करून जैन दीक्षा स्वीकारली
marathinews24.com
पुणे – जैन शासनाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल असा अविस्मरणीय क्षण ‘संयमरंग उत्सवा’दरम्यान अनुभवायला मिळाला. तब्बल ६४ मुमुक्षूंनी सांसारिक जीवनाचा त्याग करून जैन दीक्षा स्वीकारली. सुमारे २५ हजारांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भव्य दीक्षा सोहळ्याने संपूर्ण परिसर आध्यात्मिक उर्जेने भारावून गेला.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनामुळे ३०५ एकरांवर होणार फळबाग व देशी वृक्षलागवड – सविस्तर बातमी
हा महोत्सव शांतिचंद्रसूरी समुदायाचे गच्छाधिपती आचार्य सोमसुंदरसूरीजी, आचार्य योगतिलकसूरीजी, आचार्य कुशलचंद्रसूरीजी आणि आचार्य पुण्यसुंदरसूरीजी यांच्या पावन सान्निध्यात संपन्न झाला. आचार्य भगवंतांच्या आशीर्वादाने दीक्षार्थींनी संयम, त्याग आणि साधनेचे कठोर व्रत स्वीकारले.
‘रजोहरण’ अर्पण विधीच्या वेळी संपूर्ण मैदान “जैनं जयति शासनम्” या घोषणांनी दुमदुमून गेले. दीक्षा विधीदरम्यान अनेक कुटुंबांसाठी तो अत्यंत भावनिक क्षण ठरला. विशेष आकर्षण ठरले अध्यात्म परिवाराशी संबंधित युवा कार्यकर्ते ऋषभभाई आणि त्यांची धर्मपत्नी सोनलबेन यांचा दृढ संकल्प. दोघांनीही तरुण वयात संसाराचा त्याग करून आजीवन ब्रह्मचर्य स्वीकारत उपस्थितांना प्रेरणेचा संदेश दिला.
या प्रसंगी महाराष्ट्र सरकारचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उपस्थित राहून दीक्षार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावनांना अभिवादन केले. जैन समाजातील विविध ट्रस्टचे मान्यवर, संस्थांचे प्रतिनिधी आणि हजारो भाविकांनी सोहळ्यास उपस्थिती लावली होती.असाच भव्य दिव्य ६४ संयमींची ‘वडी दीक्षा’ सोहळा येत्या ७ मार्च रोजी मुंबईतील बोरिवली येथे श्री शांतिचंद्र शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य उत्सवात पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
























