शिवनेरी कन्स्ट्रक्शनवर कठोर कारवाईची मागणी
पुणे – सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम, पोथरे, जातेगाव तसेच इतर अनेक गावांमध्ये उभारण्यात आलेल्या साठवण पाझर तलावांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मंगळवारी मृद व जलसंधारण विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर (येरवडा, पुणे) तीव्र बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
पुण्यात ड्रग्ज तस्करांविरुद्ध कारवाईचा बडगा – सविस्तर बातमी
यावेळी प्रहार संघटना सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, प्रहार करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, शेतकरी प्रताप तळेकर, काका चव्हाण, शिवाजी तळेकर, बापू गलांडे, मच्छिंद्र कोकाटे, चेअरमन संतोष मोठे, सोनू बिचितकर, केदार बिचितकर व इतर केम जातेगाव पोथरे शेतकरी वर्ग प्रहार संघटना कार्यकारी पदाधिकारी उपस्थित होते.
या तलावांची कामे शिवनेरी कन्स्ट्रक्शन या संस्थेमार्फत करण्यात आली असून कंत्राटदार शिवाजी तळेकर यांनी शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे शिवनेरी कन्स्ट्रक्शन संस्थेला तात्काळ ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे तसेच संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच संबंधित संस्थेला आठ दिवसांच्या आत सर्व शासकीय विभागांतून ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकण्यात यावे, अशी ठाम मागणी प्रहार संघटनेने केली आहे. आठ दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास पुढील आंदोलन थेट मंत्रालयात करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
मुख्य अभियंता जलसंधारण विभाग, येरवडा, पुणे येथील नितीन दुसाने यांनी प्रहार संघटना व शेतकर्यांच्या तक्रारीची दखल घेत वरिष्ठ दक्षता व गुणनियंत्रण पथक, मृद व जलसंधारण विभाग, पुणे यांना लेखी पत्राद्वारे प्रकरण कळविले आहे. तसेच संबंधित गावांतील अपूर्ण अवस्थेत असलेली कामे तातडीने रद्द करून नवीन ठेकेदार नेमून ती लवकर पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली.
दरम्यान, ग्रामविकास मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रकरणाची दखल घेत हिवाळी अधिवेशनात (दि.14 डिसेंबर) हा मुद्दा गांभीर्याने मांडला आहे. शिवनेरी कन्स्ट्रक्शनवर ठोस कारवाई व ब्लॅकलिस्ट केल्यास प्रहार जनशक्ती पक्षातर्फे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा जंगी सत्कार करण्यात येईल, अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
या आंदोलनाला राष्ट्रीय समाज पार्टीने जाहीर पाठिंबा दिला असून, प्रहार संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.























