मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते प्रकाशन
marathinews24.com
मुंबई – बाल भारतीच्यावतीने प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ दिवाळी अंकाचे प्रकाशन आज महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले. कार्यक्रमास शालेय शिक्षण विभागाचे सचिव रनजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त कैलाश पगारे, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार, बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक, नियंत्रक हेमंत बाबर, किशोरचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे व शिक्षण विभाग सुकाणू समिती सदस्य उपस्थित होते.
गुटखा विक्रेत्यांवर कडक कारवाई करा- पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी
मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, त्यांना पुस्तकाबाहेरील ज्ञान मिळावं, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि त्यांच्या कोवळ्या मनावर उत्तम मूल्यसंस्कार व्हावेत या उद्देशाने गेली 54 वर्षे ‘बालभारती’च्या वतीने ‘किशोर’ हे मासिक प्रकाशित केले जाते . किशोरचा दिवाळी अंक हा नेहमीच आकर्षक आणि नाविन्यपूर्ण असतो. यंदाचा ‘किशोर’चा अंक बाल आणि किशोर या दोन्ही गटांतील मुलांसाठी रंजक, बोधप्रद आणि संस्कारक्षम असा आहे. मुलांच्या आकलन शक्तीचा अंदाज घेऊन अंकातील विषय आणि भाषाशैली निवडण्यात आली आहे.
अंकात अनेक मान्यवरांनी लेखन केलं आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महावीर जोंधळे, अंबरीश मिश्र, श्रीकांत बोजेवार, राजीव तांबे, प्रवीण दवणे, वंदना भागवत, दासू वैद्य, संजय भास्कर जोशी,अच्युत गोडबोले अशी अनेक मोठी नावं आहेत. कथा, कविता, ललित, लेख, कोडी आणि कार्टून असा भरगच्च मनोरंजक मजकूर आणि आकर्षक चित्र यांनी सजलेला हा दिवाळी अंक आहे. या अंकाचे मुखपृष्ठ ख्यातनाम चित्रकार रेश्मा बर्वे यांनी चितारले आहे. बाल आणि किशोर वाचकांसह मोठ्या वयाच्या वाचकांनाही हा अंक नक्कीच आवडेल असा आहे.






















