स्वरमयी गुरुकुल आयोजित ‘किराना परंपरा’ मालिकेत गुंफले चौथे पुष्प
marathinews24.com
पुणे – तलम मुलायम, चतुरस्र गायकी, खुला विचार आणि एका रागातून दुसऱ्या रागात लीलया होणारी सुरेल फिरस्ती याविषयीची सखोल माहिती आज पुणेकर रसिकांना मिळाली.
गहिनीनाथ गडाचा अनुयायी म्हणून विकासकामांची जबाबदारी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी
निमित्त होते डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचालित स्वरमयी गुरुकुल आयोजित ‘किराना परंपरा’या मालिकेतील चौथ्या सत्राचे. उस्ताद अब्दुल करीम खाँ प्रणित गायकीचा प्रसार करणारे गायक व गुरू पंडित सुरेशबाबू माने यांच्यावर रविवारी (दि.११) विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवाजीनगरमधील स्वरमयी गुरुकुल सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात संगीताचे अभ्यासक डॉ. चैतन्य कुंटे, डॉ. प्रभा अत्रे यांचे शिष्य, गायक डॉ. अतींद्र सरवडीकर तसेच पंडित सुरेशबाबू माने यांच्यावर पीएचडी प्राप्त केलेल्या डॉ. अश्विनी वळसंगकर यांचा सहभाग होता.
हिंदुस्थानी ख्याल गायकीच्या संदर्भात किराना घराण्याच्या देदीप्यमान परंपरेतील पंडित सुरेशबाबू माने यांच्या आवाजातील दुर्मिळ ध्वनिमुद्रणे ऐकविण्यात आली. पं. सुरेशबाबू माने यांच्या रेशमी सुरांची प्रभा यावेळी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी ठरली. दिवंगत ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या संकल्पनेतून ‘किराना परंपरा’ही विशेष कार्यक्रम मालिका सुरू करण्यात आली आहे. पंडित सुरेशबाबू माने यांची नात सुजाता साळवी व हिराबाई बडोदेकर यांची नात अरुणा बडोदेकर यांच्यासह संगीत प्रेमी रसिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
राग जोगियामधील ‘हरी का दर्शन पायो…’ हे पंडित सुरेशबाबू यांच्या आवाजातील ध्वनिमुद्रण ऐकवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राग शुद्ध कल्याण, हिंडोल, चंद्रकंस, खामाजमधील ठुमरी, पहाडी दादरा तसेच पंडित सुरेशबाबू माने रचित नाट्यगीतांचे ध्वनिमुद्रणही ऐकविण्यात आले. पंडित सुरेशबाबू यांचा जीवन प्रवास थोडक्यात उलगडत डॉ. अश्विनी वळसंगकर म्हणाल्या, पंडित सुरेशबाबू यांचे वडील अब्दुल करीम खाँ आणि आई ताराबाई माने दोघेही महान कलाकार होते. त्यामुळे त्यांना जन्मतः सुरांचे वरदान मिळाले. एकाच स्वराला वेगवेगळ्या रागांत कसे वापरावे याचे शिक्षण त्यांना वडिलांकडून मिळाले. बुद्धी फार तेज असल्याने लहान वयातच त्यांनी सगळी विद्या ग्रहण केली तसेच वडिलांकडून विविध वाद्यांचे प्रशिक्षण घेतले होते. पंडित सुरेशबाबू माने यांनी गानकोकिळा हिराबाई बडोदेकर, विदुषी सरस्वतीबाई राणे, विदुषी डॉ. प्रभा अत्रे, विदुषी माणिक वर्मा, पंडित वसंतराव देशपांडे, पंडित वामनराव देशपांडे, पंडित बसवराज राजगुरू हे शिष्य घडवले. किराणा घराणे समृद्ध करण्यात त्यांचे योगदान मोठे होते. स्वतःच्या विचाराने गा, कोणाची नक्कल करू नका असा सल्ला त्यांनी आपल्या शिष्यांना दिला. पंडित सुरेशबाबू यांच्या गायकीची खासियत आणि बारकावे सांगताना डॉ. चैतन्य कुंटे म्हणाले की, उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब आणि पंडित सुरेशबाबू माने यांच्या गायन शैलीत साम्य असले तरी त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटविला होता. गायनातील छूट तान ही त्यांची खासियत होती. तसेच लय अंगाने सरगम सादर करणे हे त्यांच्या गायकीतील वैशिष्ट्य होते. पंडित सुरेशबाबू माने यांच्या ठुमरी सादरीकरणातील वेगळेपण प्रकर्षाने जाणवत असे. त्यांचा पहाडी दादरा प्रसिद्ध होता. त्यांच्या नाट्यसंगीत गायकीत बालगंधर्व आणि दीनानाथ मंगेशकर यांच्या गायकी अंगाचे अंश प्रकर्षाने जाणवत होते.
डॉ. अतींद्र सरवडीकर म्हणाले, पंडित सुरेशबाबू यांचे सर्वच घराण्यांच्या कलाकारांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे इतर घराण्यातील गायन वैशिष्ट्ये त्यांच्या गायकीत दिसत. तीनही सप्तकात फिरत असणारा त्यांचा लवचिक आवाज अतिशय माधुर्यपूर्ण होता. शिष्यांना प्रोत्साहन देण्याच्या खुलेपणामुळे त्यांच्या प्रत्येक शिष्याच्या गायकीत वेगळेपण जाणवते. कार्यक्रमाचा समारोप पंडित सुरेशबाबू माने यांच्या आवाजातील राग भैरवीमधील ठुमरी ऐकवून करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वरमयी गुरुकुलचे कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे यांनी केले तर मान्यवरांचा सत्कार ज्येष्ठ निवेदिका व लेखिका शैला मुकुंद यांनी केला.




















