डोंगरेच्या कुटुंबीयांना कारखान्याकडून २१ लाखाची मदत
marathinews24.com
बीड (अनंत जाधव) – धाराशिव जिल्ह्यातील भाऊसाहेब बिराजदार कारखान्याच्या परिसरात डोंगरेवाडीच्या गणेश डोंगरे तरुणाचा अपघात होऊन जीव गेल्याची घटना घडली होती . या कुटुंबाला आर्थिक भरपाई मिळावी म्हणून स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोड कामगार व मालवाहतूक संघटनेच्यावतीने शुक्रवारी ( दि. ९) कारखान्याच्या थेट गव्हाणीमध्ये उतरून आंदोलन केले होते. तब्बल १५ तास डोंगरेच्या कुटुंबियांनी टाहो फोडल्यानंतर मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास कारखाना प्रशासनाला जाग आली. त्यानंतर डोंगरेच्या कुटुंबीयांना २१ लाखांचा धनादेश देण्यात आला. तर जखमी झालेल्या दोघांना प्रत्येकी ५० हजाराची भरपाई म्हणून मदत देण्यात आली.
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण थांबेना; सरकारने लक्ष देण्याची मागणी – सविस्तर बातमी
घटनेला सहा दिवसानंतर अखेर मयताच्या कुटुंबीयांना भरपाई निधी कारखान्याकडून मिळाला आहे. निधी मिळवण्यासाठी स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोड कामगार व मालवाहतूक संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कृष्णा तिडके, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय आंधळे यांनी या आंदोलनाला लीड केले. तर या आंदोलनात ज्येष्ठ नेते प्रा. सोमनाथ बडे, माऊली शिरसाट, माजी नगरसेवक सतीश बडे, भाजपाचे वडवणी शहराध्यक्ष श्रीमंत मुंडे, कोठारबनचे उपसरपंच भास्कर मुंडे, मानवी हक्क अभियानाचे वडवणी तालुकाध्यक्ष विष्णू मुजमुले, बाबा मुंडे यांच्यासह स्थानिक जय भवानी ऊसतोड कामगार संघटनेने पाठिंबा दिला. स्थानिकचे मानवी हक्क अभियानाच्या कार्यकर्त्यांनीही मदत केली. हे आंदोलन दि.९ जानेवारीला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सुरू झाले होते. तर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास या आंदोलनाचा समारोप झाला.
आंदोलन मोडीत काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्न देखील केले होते. परंतु कोणत्याही मुजोरीला न जुमानता आंदोलनकर्त्यांनी एकी दाखवत हे आंदोलन यशस्वी पार पाडले. हे आंदोलन तब्बल १५ तास चालले होते. भाऊसाहेब बिराजदार कारखान्याला अखेर घाम फुटला. मयत ऊसतोड कामगार गणेश डोंगरे यांच्या पत्नीच्या नावे २१ लाखाचा आर्थिक भरपाईचा धनादेश अश्विनी डोंगरे यांच्याकडे सुपूर्द केला. यामध्ये जखमी बाबा नागरगोजे व भरत डोंगरे या दोघानना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. डोंगरे यांच्याकडे असलेली कारखान्याची संपूर्ण उचल देखील माफ करण्यात आली आहे. तर भरपाईचा धनादेश देताना कारखान्याचे प्रशासन उपस्थित होते. तर ही आर्थिक भरपाई नुकसान दिल्याप्रकरणी आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त करत कारखान्याचे आभार मानले आहे.




















