शिक्षणातील सुरक्षित क्षितिजे परिषद उत्साहात
marathinews24.com
पुणे – शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांचा ओढा कायम आहे. त्यांच्यातील सामाजिक, नैतिक जनजागृतीद्वारे संघटनात्मक संकल्प पुुर्तीस नेणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. प्रामुख्याने पालक, शैक्षणिक संस्था, विद्यार्थ्यांसह समाजानेही बदलासाठी प्राधान्य दिले पाहिजे. बदलाची सुरूवात प्रत्येकाने स्वतःपासून केली पाहिजे, असे मत पुणे पोलिसांनी आयोजित केलेल्या एकदिवशी परिषदेत मान्यवरांनी मांडले. शिक्षणातील सुरक्षित क्षितिजे २०२५ ही परिषद सेनापती बापट रस्त्यानील हॉटेलमध्ये पार पडली. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, सिम्बॉयशिसचे संस्थापक शां.ब. मुजूमदार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, एस. के. जैन, विद्या येरवडेकर, अपर आयुक्त पंकज देशमुख उपस्थित होते.
देवदासी व पारलिंगी माता-भगिनींसाठी दीपावली स्नेह मेळावा संपन्न – सविस्तर बातमी
सिम्बॉयशिसचे संस्थापक शां. ब. मुजूमदार म्हणाले, शैक्षणिक संस्थामध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. परराज्यातील अनेक पालकांकडून विद्यार्थ्यांना महाराष्ट्रासह पुण्यामध्ये शिक्षणासाठी पाठविले जात आहे. साधारणपणे दरवर्षी ७ ते ८ लाख विद्यार्थी एकट्या पुण्यात शिक्षणाला येतात. त्यापैकी ६५ टक्के महारष्ट्रातील असून, उर्वरित ३० टक्के देशभरातून आणि ५ टक्के विद्यार्थी परदेशातून पुण्यात शिक्षणासाठी दाखल होत आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, पुण्यातील वातावरण निश्चीतच चांगले असून, पुणे पोलिसांच्या अथक मेहनतीमुळे आपण सर्वजण सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कामगिरीचे त्यांनी विशेष कौतुक केले.
कुलगुरू सुरेश गोसावी म्हणाले, शिक्षणातील सुरक्षित क्षितिजे २०२५ या परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण होण्यास मदत मिळणार आहे. दरम्यान, सध्यस्थितीत पुण्यात साडेसात लाखांवर विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही तितकीच महत्वाची आहे. पारंपारिक आणि अत्याधुनिकतेचा साज पुणे शहराला लाभला आहे. विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृती करणे, शैक्षिणकतेचे महत्व पटवून सांगणे, सामाजिक दायित्व निभावण्यासंदर्भात धडे देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, परिषदेला उपस्थित असलेल्या एस. के. जैन यांनीही विद्यार्थ्यांना संबोधित केले. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात हातभार लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शैक्षणिक संस्था, पालक, शिक्षक-विद्यार्थ्यांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांवरील संस्कार आपली जबाबदारी- पोलीस आयुक्त अमितेश कुमार
पुणे हे विद्येचे माहेरघर असून, दिवसेंदिवस शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढीस लागली आहे. शैक्षणिक जीवनात मुलांना समजावून सांगण्यात पालकांची फार मोठी भूमिका असते. विशेषतः पौगंडावस्थेत मुलांवरील संस्कार आणि त्यांना दिलेली शिकवण आयुष्यभराची शिदोरी ठरते. सोशल मीडियाच्या जमान्यात आपली मुले-मुली कशाप्रकारे व्यक्त होतात, याची चौकशी पालकांनी केली पाहिजे. विद्यार्थ्यांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, महाविद्यालयात शिक्षणात त्याचे लक्ष आहे का, अमली पदार्थांपासून तो दूर राहतो का अशा गोष्टींवर पालकांनी बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. दरम्यान, पुण्यात घडलेल्या अनेक घटनांमुळे पालकांनी आपल्या मुलांचा विचार करणे गरजेचे आहे. पोर्शे अपघात प्रकरण, कोंढव्यातील अत्याचार पीडित तरूणीने केलेले खोटे आरोप, खराडी ड्रग्ज प्रकरण यासह अनेक प्रकरणांचा त्यांनी धांडोळा घेतला. उपायुक्त निखील पिंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
परिषदेसाठी पुणे पोलिसांचे टीमवर्क
विद्यार्थ्यांसाठी आयोजित परिषद यशस्वी करण्यासाठी पुणे पोलिसांचे टीमवर्क दिसून आले. प्रामुख्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, मुख्यालय उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते, उपायुक्त संभाजी कदम, उपायुक्त सोमय मुंडे, उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, उपायुक्त संदीप भाजीभाकरे, उपायुक्त विवेक मासाळ, उपायुक्त हिंम्मत जाधव, एसीपी नंदा पारजे उपस्थित होते.






















