पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे कार्यक्रमाचे आयोजन
marathinews24.com
पुणे – ‘तुझे आहे तुज पाशी’ या पु. ल. देशपांडे लिखित नाटकातील नाट्यप्रवेश, पुलंच्या ‘असा मी असा मी’ या एकपात्री प्रयोगावर आधारित सादरीकरण आणि पुलंनी संगीतबद्ध केलेली तसेच अभिनयातून रंगविलेल्या गीतांचे बहारदार सादरीकरण रसिकांना आज अनुभवायला मिळाले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नगरपालिका व नगरपरिषदेच्या तयारीचा घेतला आढावा – सविस्तर बातमी
प्रतिभासंपन्न लेखक, जाणकार दिग्दर्शक, कुशल नट, दर्दी गायक, मार्मिक नकलाकार, चतुर विडंबनकार, मनस्वी संगीतकार आणि मराठी मनाचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जयंती निमित्ताने आयोजित ‘बहुरंगी, बहुढंगी भाई’ या विशेष कार्यक्रमात रसिकांनी हा अनुभव घेतला. पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे पूना गेस्ट हाऊस येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीस केतकी पांडे आणि सुबोध चितळे यांनी ‘तुझे आहे तुज पाशी’ नाटकातील गीता व आचार्य यांच्यातील संवादात्मक नाट्यप्रवेश सादर केला. त्यानंतर सुबोध चितळे यांनी एकपात्री सादरीकरणातून ‘असा मी असा मी’ची प्रभावी मांडणी केली. त्याला रसिकांनी भरभरून दाद देत पुन्हा एकदा पुलंच्या आठवणी जागविल्या. पुलोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, प्रसिद्ध अर्कचित्रकार चारुहास पंडित, भाग्यश्री पंडित, आनंद सराफ, राम कोल्हटकर, गझलकार प्रदीप निफाडकर, विद्यापीठाच्या सिनेट सदस्या सविता केळकर, प्रांजल गांधी, ज्योत्स्ना सरदेशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रसिद्ध गायिका मनिषा निश्चल यांनी पु. ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेली तसेच चित्रपटात अभिनित ‘नाचरे मोरा’, ‘कबिराचे विणतो शेले’, ‘करू देत शृंगार’, ‘तुझ्या मनात कुणीतरी लपलय गं’, ‘हसले मनी चांदणे’, ‘ईथेच टाका तंबू’, ‘ही कुणी छेडिली तार’, ‘माझीया माहेरा जा’, ‘केतकीच्या बनात’, ‘जाळी मंदी पिकली करवंद’ ही गीते बहारदारपणे सादर करून रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण व प्रभावी निवेदन रवींद्र खरे यांचे होते तर प्रसन्न बाम, अभय इंगळे, अमित कुंटे यांनी समर्पक साथसंगत केली.
पूना गेस्ट हाऊसच्या वास्तूत आल्यानंतर अनेक आठवणी जागृत होतात असे सांगून वीरेंद्र चित्राव म्हणाले, आज रसिकांनी स्वत:चे मनोरंजन व स्मरणरंजन करण्यापेक्षा मराठी साहित्य क्षेत्रातील थोर साहित्यिकांच्या साहित्य संपदेची जपणूक करणे आवश्यक आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी या साहित्यिकांचे विचार समाजापुढे आणत त्यांचे संवर्धन करत पुढील पिढीपर्यंत नेणे आवश्यक आहे. पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचच्या माध्यमातून डॉ. किशोर सरपोतदार व कुटंबिय हा सांस्कृतिक वारसा जपून ठेवण्याचे कार्य करत आहेत. कलाकरांचा सत्कार वीरेंद्र चित्राव यांनी केला तर डॉ. किशोर सरपोतदार यांनी प्रास्ताविक केले.






















