लोकशाही वाचवण्याचा निर्धार व्यक्त; मतदार याद्यांतील घोळ, धार्मिक ध्रुवीकरणाबाबत काँग्रेसची टीका
marathinews24.com
पुणे – सत्तेत राजण्यासाठी भाजपकडून कसेही राजकारण केले जात आहे. आम्हाला ईव्हीएमबाबत शंका असून, धार्मिक धु्रवीकरणासह मतचोरी करणे हाच भाजपाचा फंडा आहे. लोकशाहीचा ढाचा वाचवण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असे मत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बालगंधर्व रंगमंदीरात आयोजित सेवा कर्तव्य त्याग सप्ताहात ते बोलत होते.
पुण्यातील दबावाने झुकलेली महसूल यंत्रणा – सविस्तर बातमी
लोकशाहीची हत्या, वोटचोरीबाबत विदारक सत्य दाखविणार्या प्रदर्शनाचे त्यांनी उद्घाटन केले. यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, माजी महापौर प्रशांत जगताप, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख संजय मोरे, गोपाळ तिवारी, वीरेंद्र किराड, अविनाश बागवे, स्वाती शिंदे, लता राजगुरू, कैलास गायकवाड, अनिल सोडकर, प्रथमेश आबनादे, चेतन अग्रवाल उपस्थित होते.
थोरात म्हणाले, देशात २००४ ते २०१४ काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी सरकारने नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले होते. विशेषतः अन्न सुरक्षा , शैक्षणिक उपक्रम, भु संपादन कायद्यात अनेक बदल केले. तसेच जागतिक पातळीवर उल्लेखलेल्या पोलिओ डोससाठी जे काम सरकारने केले, ते अद्भुत होते. मात्र, २०१४ मध्ये भाजपने नवीन तंत्रज्ञान वापरून जातीय ध्रुवीकरण केले. त्यांनी देश दिशाहीन करीत सत्ता काबीज केली आहे. भाजप हा सत्तेवर राहण्यासाठी काहीही करत आहे. महाराष्ट्र हा संतांचा प्रदेश असून, धर्माचे रक्षण करणारे राज्य आहे. आता मात्र, धर्मात किती राजकारण केले जात आहे. यामध्ये फक्त मताचे राजकारण करण्याचा उद्देश भाजपाचा आहे. सोनम वंगचुक काय चुकले, हरियाणा शेतकरी बळी गेले, महिला ऑलिम्पिक विजेत्या आंदोलन, मुख्य न्यायाधीश यांच्यावर बूट फेकला जात आहे, तरीही जनमानस पेटून उठत नसेल तर ही लोकशाहीची हत्या आहे.
शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, देशातील विविध प्रश्नांवर राहुल गांधी यांनी आवाज उठवला आहे. त्यामुळे हळूहळू लोकांमध्ये जनजागृती होण्यास मदत होत आहे. आपले मत कुठे जात आहे, हेच या प्रदर्शनातून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आर्थिंक भ्रष्टाचाराबरोबर मतचोरीही भाजपने केली आहे. त्यामुळे लोकांच्या मताची चोरी कशी होते, हे दाखवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माजी महापौर प्रशांत जगताप म्हणाले, लोकशाहीची हत्या, वोटचोरीबाबत विदारक सत्य दाखविणार्या प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकशाही वाचवण्यासाठीचा उपक्रम राबवला जात आहे. केंद्र सरकारच्या विरोधात लोकांमध्ये संताप असून, मतचोरी करून हे सत्तेत कसे आले हे आपल्याला लोकांपर्यंत पोहचवायचे आहे. त्यासोबतच मतदार याद्यांतील घोळही संपुष्टात आणण्यासाठी प्राधान्य द्यावे लागणार आहे. तसेच माजी मंत्री रमेश बागवे यांनीही केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. निवडणूका हायजॅक करून सत्ता मिळविण्यामध्ये भाजप अग्रेसर आहे. पुण्यात अनेक दुबार मतदार असून, आगामी निवडणुकीमध्ये आपल्याला सावधानता बाळगावी लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.




















