३ किलोमीटरवरून पायपीट करून आणावे लागते पाणी
marathinews24.com
बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यातील केज तालुक्यातील कोरडेवाडी हनुमान वस्ती, कानिफनाथ वस्ती आणि सुळकी वस्ती या दुर्मिळ वस्त्या-तांड्यावर ६०० ते ७०० लोकसंख्या आहे. गावातील पाझर तलाव आणि बोअरवेल आटल्याने, विहिरींनीही तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे गावातील वस्ती, तांड्यावर राहणाऱ्या महिलांना रखरखत्या उन्हात डोक्यावर घागर घेऊन पायपीट करावी लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. भर उन्हातान्हात तारेवरची कसरत करत संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे वस्ती तांड्यावरील राहणाऱ्या लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण होऊन संताप व्यक्त होत आहे.
राज्यात लाळखुरकत लसीकरण मोहिम-९ ची जय्यत तयारी; १.१९ कोटी लस मात्रा उपलब्ध होणार – सविस्तर बातमी
पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडून याबाबत दक्षता घेऊन तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. सध्या तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सिअस अंश असून पाण्याची गरज अधिक भासत आहे. अशा परिस्थितीत महिलांना आणि पुरुषांना सकाळपासूनच रानोमाळावर फिरून विहिरींमधून शेंदून पाणी आणावे लागत आहे. अनेकदा शेतमालक पाणी देईल की नाही याचीही शाश्वती नसल्याने महिलांना मोठ्या हालअपेष्टाचा सामना करावा लागत आहे. अगोदरच बीड जिल्हा दुष्काळी असल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वारंवार कोरडेवाडी ग्रामस्थांकडून पाण्यासाठी आंदोलन उभे करून सुद्धा पाणी टंचाईचा प्रश्न मिटत नसल्याने चिंता वाढली असून तलावाचा प्रश्न कधी सुटणार आणि गावातील पाणी टंचाई कधी थांबणार, असा सवाल गावातील नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देणार का? गावांसाठी पाण्याचे टॅंकर सुरु करून पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवणार का? असे सवाल कोरडेवाडी ग्रामस्थांकडून विचारले जात आहेत.
जिल्हाधिकारी याकडे लक्ष देऊन पाण्याचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे . दरम्यान, ६०० ते ७०० लोकसंख्या असलेल्या वस्ती आणि तांड्यावर निवडणूका आल्या की लोकप्रतिनिधी आणि राजकीय मंडळींकडून मते मागण्यासाठी रांगा लावतात. मतदानाच्या दिवशी ग्रामस्थांना पोकळ आश्वासने देतात. पण निवडणूका संपल्या की हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या माता माऊलींच्या पायाला बसणारे उन्हाच्या तडाख्याचे चटके या राजकीय मंडळींना दिसत नाहीत का? लोकप्रतिनिधी फक्त मतदानापुरतेच का? असा संतप्त सवाल वस्ती तांड्यावरील राहणाऱ्या लोकांकडून विचारले जात आहेत.
कोरडेवाडी गावाच्या अंतर्गत येणाऱ्या हनुमान वस्ती, कानिफनाथ वस्ती आणि सुळकी वस्ती या दुर्मिळ वस्त्या असून येथील लोकसंख्या ६०० च्या वर आहे. परंतु तेथील लोकांना पाण्यासाठी वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. जलजीवन योजना राबवून देखील तेथील नागरिकांना पाणीपुरवठा न झाल्यामुळे उन्हाळ्यामध्ये भटकंती करावी लागत आहे. येथे पाण्याची योग्य ती व्यवस्था नसल्यामुळे महिलांना व पुरुषांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच जनावरांसाठी पाणी तब्बल दोन ते तीन किलोमीटर अंतरावर पायपीट करत जाऊन आणावे लागते. पाण्याच्या आशा अभावामुळे नागरिकांना डोक्यावरून पाणी घेऊन येऊन त्यांची उपजीविका भागवावी लागते. त्यामुळे नागरिकांची खूप विटंबना होते. तरी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन टँकरची किंवा अन्य कोणतीही उपाययोजना करून पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी प्रतिक्रिया उपसरपंच संतोष यादव यांनी दिली आहे.





















