पोलिसांकडून ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे माहिती संकलित
marathinews24.com
पुणे – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात गर्दीचे नियंत्रण, व्यवस्थापन करण्यासाठी पुणे पोलिसांनी यंदा प्रथमच एआय तंत्रज्ञानाचा (आर्टीफिशियल इंटलिजन्स) वापर केला होता. त्यानुसार पालखी मुक्कामी असताना तब्बल ५ लाख वारकरी पुण्यात आल्याची नोंद झाली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात ३ लाख वारकरी आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात २ लाख वारकरी सहभागी झाल्याची माहिती एआय तंत्रज्ञानाद्वारे केलेल्या मोजणीतून मिळाली आहे.
पालखी सोहळ्यात भाविकांचे मोबाइल लांबविले – सविस्तर बातमी
संतांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार्या वारकर्यांची नोंद करण्यासाठी पुणे पोलिसांनी एआय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेर्यांची मदत घेतली होती. त्यानुसार श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीत २ लाख ९५ हजार वारकरी सहभागी झाले होते. तर जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात १ लाख ९५ हजार वारकरी सहभागी झाले होते. पोलिसांनी पालखी मार्गावर वेगवेगळ्या भागात एआय तंज्ञज्ञानावर आधारित कॅमेरे बसविले होते. त्यातील आकडेवारीनुसार पालखी सोहळा पुणे मुक्कामी आल्यावर ५ लाख वारकरी पुण्यात दाखल झाले होते. एआय कॅमेरे नरवीर तानाजीवाडी, संचेती रुग्णालय, वेधशाळा चौक, खंडोजीबाबा चौक, लक्ष्मी रस्ता भागात बसविले होते. कॅमेर्यांनी केलेली नोंद आणि माहितीचे विश्लेषण केले असून, पालखी प्रस्थान सोहळ्यात हे कॅमेरे प्रस्थान मार्गावर बसविले होते.
पालखी सोहळ्यात तब्बल २ हजार ६०० वाहने पुण्यात
संतांचा पालखी सोहळा शुक्रवारी (२० जून) शहरात दाखल झाला होता. श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत जवळपास दोन लाख वारकरी सहभागी झाले होते. तसेच दिंडीतील ६०० वाहने शहरात आली होती तर श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत तीन लाख वारकरी मुक्कामी होतेत. माउलींच्या सोहळ्यातील तब्बल २ हजार वाहने शहरात दाखल झाली होती, अशी माहिती एआय तंत्रज्ञानावर आधारित विश्लेषणातून करण्यात आली आहे.
एआय तंत्रज्ञानामुळे गर्दीचे व्यवस्थापन, नियोजन आणि वाहतूक नियोजनात मदत झाली, अशी माहिती पोलीस अधिकार्यांनी दिली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त निखील पिंगळे, वाहतूक उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी गणेश इंगळे, एसीपी राजेंद्र मुळिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांनी पालखी सोहळ्यावेळी विशेष कामगिरी बजावली.
पालखी सोहळ्यात एआय तंत्रज्ञानाचा यंदा वापर केला असून, त्याद्वारे सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी बांधवांची संख्या नोंदविण्यात आली. तंत्रज्ञानाचा वापर करुन नियोजन, अंमलबजावणी, तसेच विश्लेषण करण्यात आले. पालखी सोहळ्यासाठी पोलिसांच्या कडक बंदोबस्तासह आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर