आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट
marathinews24.com
पुणे – देशभर गाजत असलेल्या नीट २०२६ परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे पुण्यातही संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित शिक्षण माफिया, एजंट आणि कोचिंग क्लासेसवर कठोर कारवाईसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. आंदोलनात नीट पेपरफुटी प्रकरणी अटक करण्यात आलेले आरसीसी क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष शिवराज मोटेगावकर तसेच इतर आरोपींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
निर्यात वाढीसाठी मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करा- अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत – सविस्तर बातमी
आंदोलकांनी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. दरम्यान, अखिल भारतीय छात्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे यांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत आंदोलन अधिक तीव्र केले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
मच्छिंद्र चिंचोळे म्हणाले की, देशभरात सातत्याने घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत करून परीक्षा देतात; मात्र काही शिक्षण माफिया आणि भ्रष्ट प्रवृत्तीमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात आहे. लातूर येथे या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली असली तरी, या संपूर्ण रॅकेटमागील सर्व संबंधितांची चौकशी होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चिंचोळे यांनी पुढे आरोप केला की, पुण्यातील अनेक कोचिंग क्लासेस नियमबाह्य प्रवेश प्रक्रिया राबवत असून, मोठमोठ्या जाहिराती आणि खोट्या यशकथा दाखवून विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत. काही संस्थांकडून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी आकारली जात असून, गुणवत्तेपेक्षा केवळ व्यावसायिक फायद्यासाठी शिक्षण व्यवस्था चालवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा संस्थांची आर्थिक चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे, पुणे जिल्हाध्यक्ष अक्षय बोडके, पुणे जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्ष सय्यद समीर टीपु, सीताराम वाघ, विष्णू एंकमळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेपरफुटीच्या तणावातून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत द्यावी आणि परीक्षा दिलेल्या सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी त्यांच्या वतीने करण्यात आली.






















