मोदींच्या उद्योग प्रतिनिधी मंडळात पुण्याच्या आरती भोसले-अहिवळे यांचा मानाचा समावेश
marathinews24.com
पुणे – भारत-नॉर्वे ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप समिटमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्योग प्रतिनिधी मंडळातील टॉप २० प्रतिनिधींमध्ये पुण्यातील ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटलच्या संस्थापक व व्यवस्थापकीय संचालिका आरती भोसले-अहिवळे यांची निवड झाली आहे. ऑस्लो येथे १८ आणि १९ मे रोजी झालेल्या या परिषदेत त्यांनी ईएसजी नेतृत्व आणि शाश्वत विकास या विषयावर भाषण केले. ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल ही संस्था ईएसजी कन्सल्टिंग, सस्टेनेबिलिटी रिपोर्टिंग, कार्बन फूटप्रिंटिंग, लाइफ सायकल असेसमेंट आणि पर्यावरणीय अनुपालन या क्षेत्रांत कार्यरत आहे. तसेच नॉर्वेतील ईपीडी ग्लोबल या आंतरराष्ट्रीय संस्थेची भारतातील ‘लीगल बिझनेस पार्टनर’ म्हणूनही संस्था कार्य करते.
आरएमसी दरवाढीवर तोडगा काढण्यासाठी बीएआय-आरएमसी यांच्यात संयुक्त बैठक – सविस्तर बातमी
पर्यावरण, सामाजिक जबाबदारी आणि प्रशासन (ईएसजी), हवामान बदल, हरित औद्योगिक परिवर्तन आणि शाश्वत आर्थिक विकास या विषयांवर या परिषदेत चर्चा झाली. परिषदेला नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोरे यांच्यासह दोन्ही देशांतील वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते. भारताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सहभागी झाले होते. दोन्ही पंतप्रधानांसह आयोजित विशेष मेजवानीसाठीही आरती भोसले निमंत्रित करण्यात आले होते. ‘ग्रीनएक्स’चे सहसंस्थापक सागर अहिवळे हेही या दौऱ्यात सहभागी झाले आहेत.
या परिषदेमध्ये जगभरातील धोरणकर्ते, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, उद्योगजगताचे अग्रणी प्रतिनिधी आणि पर्यावरणीय नेतृत्व करणाऱ्या संस्था एकत्र येऊन भविष्यातील हरित विकासाची दिशा निश्चित करण्यावर चर्चा करतात. या परिषदेमुळे भारत व नॉर्वे यांच्यातील नवीन ऊर्जा, कार्बन न्यूट्रॅलिटी, शाश्वत पुरवठा साखळी, हरित नवोन्मेष व पर्यावरणीय प्रशासन या क्षेत्रांतील सहकार्य अधिक दृढ झाले आहे. भारत–नॉर्वे ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप समिटच्या समारोप प्रसंगी दोन्ही देशांनी हरित तंत्रज्ञान, हवामान कृती आणि शाश्वत विकासासाठी परस्पर सहकार्य अधिक वाढवण्याचा संकल्प पुन्हा एकदा दृढ केला.
ईएसजी नेतृत्व आणि शाश्वत परिवर्तनावर प्रभावी भाषण करताना आरती भोसले-अहिवळे यांनी ईएसजी ही संकल्पना आता जागतिक व्यापार, गुंतवणूक, पुरवठा साखळी आणि आंतरराष्ट्रीय मानकांशी निगडित अत्यावश्यक बाब बनल्याचे नमूद केले. पर्यावरणीय जबाबदारी आणि नैतिक प्रशासन यांवर आधारित विकासालाच भविष्यात अधिक महत्त्व प्राप्त होईल, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टॉप २० उद्योग प्रतिनिधी मंडळात मिळालेली ही निवड म्हणजे ग्रीनएक्सच्या सातत्यपूर्ण कार्याची, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कौशल्याची आणि भारताच्या हरित परिवर्तनात दिलेल्या योगदानाची सर्वोच्च पातळीवरील मान्यता आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
भारत जगाच्या हरित अर्थव्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करत असताना, ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल ही संस्था देशातील उद्योगांना जागतिक ईएसजी मानकांशी जोडणारा, परिवर्तनाचा दिशादर्शक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारा अत्यंत मजबूत पर्यावरणीय नेतृत्वाचा चेहरा म्हणून उदयास येत आहे.
– आरती भोसले-अहिवळे, संस्थापिका, ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल






















