समर्थ पोलिसांकडून गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – मस्यपालन व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पालघरमधील तीन जणांविरुद्ध समर्थ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश पागधरे (वय ६०), विजया गणेश पागधरे (वय ५७), विपुल गणेश पागधरे (वय ३१, तिघे रा. तडीयाल, ता. डहाणू, जि. पालघर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे बिबवेवाडी भागात राहायला आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची आरोपींशी २०१९ मध्ये ओळख झाली होती. डहाणूतील बोर्डी गावाजवळ शासनाकडून कोळंबी पालनासाठी भाडेतत्त्वावर जागा मिळाली आहे. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी त्यांना दाखविले होते. आरोपींची त्यांनी रास्ता पेठेतील एका हाॅटेलमध्ये भेट घेतली होती. त्यानंतर आरोपींनी तक्रारदाराकडून वेळोवेळी पैसे घेतले. गेल्या चार ते पाच वर्षात त्यांच्याकडून १२ लाख रुपये घेतले. आरोपींनी त्यांना परतावा दिला नाही. तक्रारदाराने पैसे परत करण्याची मागणी केली. तेव्हा आरोपींनी टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक कुंभार तपास करत आहेत.




















