कोहिनूर राम नदी महोत्सवात पीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासावर दृक-श्राव्य व्याख्यान
marathinews24.com
पुणे – नदी म्हणजे पाण्याचा नुसता स्रोत नसून ती एक नैसर्गिक परिसंस्था असते. ज्यात सजीव आणि निर्जिव घटक एकमेकांवर अवलंबून असतात. राम नदी ही पुण्याची एक जीवनवाहिनी नदी असून तिच्या अस्तित्वाचा, ऐतिहासिक तथ्यांचा पर्यावरणीय, जीवशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय दृष्टीने अभ्यास होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पी. व्ही. पी. कॉलेज ऑफ आर्किटेक्टचरमधील प्राध्यापक आर्किटेक्ट देवेंद्र देशपांडे यांनी केले.
कोहिनूर कट्टा आयोजित कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवात दुसऱ्या दिवशी (दि. १७) पी. व्ही. पी. कॉलेज ऑफ आर्किटेक्टचरच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या राम नदी अभ्यासावर दृक्-श्राव्य व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी प्रा. देवेंद्र देशपांडे बोलत होते. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव उपस्थित होते. पत्रकार भवन येथे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचा समारोप शनिवारी (दि. १९) होणार असून या वेळी नागरी समस्या निवारण समिती, भूगांवला ‘राम नदी सेवक सन्मान’ कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
प्रा. आर्किटेक्ट देवेंद्र देशपांडे म्हणाले, राम नदी ही एक ऋतुस्रावी नदी असून खाटपेवाडीपासून भूकुम, भूगाव, बावधन, पाषाण, बाणेरमार्गे मुळा नदीशी तिचा संगम होतो. या नदीला ऐतिहासिक महत्त्व असून तिच्या तिरावर मानवी वस्ती आणि नैसर्गिक अधिवास आढळत असल्याच्या नोंदी उपलब्ध आहेत. राम नदीचा अभ्यास करताना तिचा जीवशास्त्रीय दृष्टीने तसेच सांस्कृतिक घटकांच्या माध्यमातून अभ्यास करण्यात आला. नदीतील जीवंत झरे, तिला येऊन मिळणारे नैसर्गिक स्रोत, नदीतील जैवविविधता, तिचे भूजल भांडार यांचा अभ्यास करतानाच विद्यार्थ्यांनी नदीच्या प्रदूषणाविषयी कारण ठरणाऱ्या घटकांचाही अभ्यास केला आहे. भारतीय समाज मनानुसार नदी ही सामाजिक घडामोडींचे, मानवीय बदलांचे केंद्रस्थान असते. त्यामुळे नदीचा अभ्यास करताना तिचा जीवशास्त्रीय दृष्टीकोनातून मागोवा घेण्यात आला. नदीच्या तिरावरील बांधकाम, त्यांच्या पद्धती, रस्त्यांचा विस्तार या विषयी सखोल माहिती संकलित करण्यात आली आहे.
पथनाट्य, प्रदर्शनाद्वारे जनजागृती
शहरीकरणाच्या अफाट वेगात राम नदी ही अत्यंत दुर्लक्षित राहिलेली असून त्यामुळे निसर्ग चक्राची मोठ्या प्रमाणात हानी झालेली दिसून येते. नदीच्या परिसरात असंख्य इमारतींचे जाळे उभारणे आवश्यक आहे का, तेथील ग्रामसंस्कृती नष्ट करणे गरजेचे आहे का याचाही विचार करणे आवश्यक आहे. नदी परिसरात अतिक्रमणे, बेकायदेशीर बांधकामे घडू नयेत या करिता शासन व्यवस्था जागृत करणे गरजेचे आहे. राम नदीच्या दुरवस्थेला कारणीभूत अनेक घटकांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी एक मुलभूत अहवाल तयार केला असून प्रदर्शने आणि पथनाट्याच्या माध्यमातून समाजजागृती करण्याचाही प्रयत्न केला जात आहे, असे प्रा. देशपांडे म्हणाले.





















