विद्यार्थ्यांना किती शिकविता यापेक्षा काय शिकवता याकडे लक्ष द्या
marathinews24.com
पुणे – संशोधनाच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा (आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स) डोळसपणे वापर होणे आवश्यक आहे. झपाट्याने बदलत असलेल्या या तंत्रज्ञानाविषयी अद्ययावत ज्ञान मिळवत रहा. स्वत: उत्तम शिक्षक म्हणून घडत असताना विद्यार्थ्यांना किती शिकविता यापेक्षा काय शिकवता याकडे लक्ष द्या. कृत्रिम बुद्धीमत्ता ही तुमची स्पर्धक नाही; मात्र या आधुनिक तंत्रज्ञानावर पूर्णपणे विसंबून राहता त्याचा मदतनीस म्हणून वापर करा, असा सल्ला तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी आणि प्रख्यात डिजिटल साक्षरता कार्यकर्ते डॉ. दीपक शिकारपूर यांनी दिला.
विधी सल्लागार नेमणुकीसाठी अर्ज करण्याचे आवाहन – सविस्तर बातमी
सेंटर फॉर सोशल रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट पुणे, साऊथ एशियन जर्नल ऑफ पार्टिसिपेटिव्ह डेव्हिलपमेंट, कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस पुणे आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील दोन दिवसीय परिसंवादाचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. त्यात डॉ. शिकारपूर यांनी आज (दि. १२) द फ्युचर ऑफ रिसर्च इन द एरा ऑफ आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स या विषयावर शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट इन द एरा ऑफ आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स : स्ट्रेन्थनिंग रिसर्च फॉर विकसित भारत @ २०४७ या अनुषंगाने कृत्रिम बुद्धीमत्तेच्या माध्यमातून शैक्षणिक दर्जा कसा वाढविता येईल या दृष्टीने प्रामुख्याने चर्चा झाली. यात ११ राज्यातील २०० पेक्षा जास्त शिक्षणतज्ज्ञ सहभागी झाले होते.
डॉ. दीपक शिकारपूर पुढे म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील जनरेटिव्ह एआयचा अयोग्य वापर अतिशय घातक ठरू शकतो. या क्षेत्रातील तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत असल्यामुळे महाविद्यालयीन अभ्यासक्रम सातत्याने अद्ययावत करणे आवश्यक आहे. तांत्रिक विषयात शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांनी उद्योग क्षेत्राशी जोडून घेतल्यास महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला नोकरीच्या संधी सहजतेने उपलब्ध होतील. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ५० टक्के तांत्रिक अभ्यासक्रम तर ५० टक्के प्रत्यक्ष अनुभव अशा पद्धतीने कार्य करणे आवश्यक आहे.
आजच्या काळात ‘स्मार्ट टिचर’ बनणे गरजचे आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी भावनिक नाते निर्माण करून त्यांना मार्गदर्शन केल्यास उत्तम विद्यार्थी घडण्याबरोबरच उत्तम शिक्षक झाल्याचे समाधान मिळेल. जे विद्यार्थी आज कृत्रिम बुद्धीमत्तेच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानावर विसंबून राहात आहेत ती जागा शिक्षकांनी घेणे आवश्यक आहे. संयोजक प्रा. बी. पी. लावणी, प्रा. अशोक सरकार, प्रा. सोनिया राजपूत उपस्थित होते.
























