ब्रिगेडियर अभय भट यांचा विश्वास; विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
marathinews24.com
पुणे – “युवापिढी प्रचंड आत्मविश्वास, जिद्द, नवतंत्रज्ञानाशी सुसंगत असलेली अशी आहे. या पिढीला योग्य दिशा मिळाली, तर देशाचा सर्वांगीण विकास झपाट्याने होईल. विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये शिक्षण, संस्कार व मूल्यांची शिकवण दिली जात आहे. भारताच्या प्रगतीमध्ये भरीव योगदान देऊ शकणारी युवाशक्ती येथे घडत आहे. त्यामुळे आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य सक्षम पिढीच्या हाती जाईल,” असा विश्वास ब्रिगेडियर अभय भट (निवृत्त) यांनी व्यक्त केला.
रक्तदानातून मानवतेचा श्वास जपू : नरेंद्राचार्यजी – सविस्तर बातमी
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या लजपतराय विद्यार्थी संकुलात भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. प्रसंगी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, खजिनदार संजय अमृते, वसतिगृह उपसमितीचे अध्यक्ष दिनकर वैद्य यांच्यासह विश्वस्त, कार्यकर्ते, पर्यवेक्षक, आजी-माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समितीच्या डॉ. अ. शं. आपटे वसतिगृहात कार्यकर्ते हेमंत राजहंस, सुमित्रा सदन वसतिगृह येथे कार्यकत्या वासंती नाटेकर, लाला लजपतराय भवन येथे कार्यकर्ते मधूसुदन बडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ब्रिगेडियर अभय भट म्हणाले, “शिस्त, धैर्य, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण हे यशस्वी जीवनाचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ स्वतःच्या करिअरचा विचार न करता समाज आणि देशासाठी आपण काय योगदान देऊ शकतो, याचा विचार केला पाहिजे. आजच्या काळात ज्ञान आणि तंत्रज्ञानाबरोबरच चांगले संस्कार, नैतिक मूल्ये आणि सामाजिक जाणीव असणे तितकेच आवश्यक आहे. आव्हाने कितीही मोठी असली तरी जिद्द, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, तर ती संधीमध्ये बदलता येतात.”
“भारत आज वेगाने प्रगती करत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण, उद्योग, शिक्षण आणि विविध क्षेत्रांमध्ये देशाची क्षमता जगासमोर सिद्ध होत आहे. या प्रगतीला अधिक वेग देण्याची जबाबदारी आजच्या तरुणाईवर आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी केला पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी त्याग आणि बलिदान दिले. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून आपण आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” असेही त्यांनी नमूद केले.
दिनकर वैद्य यांनी स्वागत प्रास्ताविकात समितीच्या कार्याविषयी, उपक्रमाविषयी माहिती दिली. यावेळी आदर्श विद्यार्थी म्हणून ओंकार जरे याला ॲड. शामसुंदर जावडेकर इंदापूर पारितोषिक, तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून तेजश्री इथापे हिला वासंतीबाई जावडेकर इंदापूर पारितोषिक पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले. सानिका येलमाटे हिने पाहुण्याचा परिचय करून दिला. सानिका खामणकर हिने सूत्रसंचालन केले. रुद्र जगदाळे याने आभार मानले.
























